Mumbai BEST Bus Accident:
दररोज बसने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांमध्ये आताच्या घडीला बेस्ट बसेसविरोधात संताप दिसून येत आहे. बेस्टच्या खासगी बसेससाठी अप्रशिक्षित चालक नियुक्त केले आहेत, त्यामुळे अपघात होत आहेत. असा मुंबईकरांचा सूर ऐकू येत आहे.
“पूर्वीच्या बेस्टच्या बस आणि चालक चांगले असायचे. परंतु, बेस्टच्या बसेसमध्ये कंत्राटी सुविधा सुरू झाल्यामुळे चालक योग्य प्रशिक्षीत आहेत कि नाही अशी आता शंका येत आहे. मुंबईचे रस्ते पाहता इलेक्ट्रिक बसेस या रस्त्यांसाठी योग्य वाटत नाहीत. बेस्ट
बसचा प्रवास स्वस्त आणि किफायतशीर असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा आहे. परंतु अलिकडे कंत्राटीकरणामुळे भरती केले जाणारे चालक प्रशिक्षीत आहेत कि नाही अशी शंका येते. त्यामुळे जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.” असे मुंबईकरांचे म्हणणे आहे.
विनाअनुभवी चालक
सध्या मुंबईच्या रस्त्यांवरुन धावणाऱ्या बेस्टच्या बहुतांश बसेस या भाड्याच्या आहेत. चालक आणि वाहक कंत्राटी पद्धतीने कामावर घेतले आहेत. बेस्टने मागील ५ वर्षात २१६० बसेस भंगारात काढल्या आहेत. तसेच २१२६ बसेस भाड्याने घेतल्या आहेत. कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या चालकांना बस चालविण्याचा फारसा अनुभव नसल्यामुळे अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.
इतकंच नव्हे तर बेस्ट बसचे खासगीकरण झाल्यापासून अपघातात वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. पूर्वी चालकांना योग्य प्रशिक्षण असायचे, मात्र आता नवशिके वाहनचालक वाहन चालवत आहेत.
३ वर्षात २४० अपघातांची नोंद
तज्ज्ञांच्या मतानुसार मुंबईत इलेक्ट्रिक बसेस आल्यापासून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. कारण इलेक्ट्रिक बसेस चालवणाऱ्या चालकांना योग्य प्रशिक्षण मिळालेले नाही. मुंबईत बेस्टच्या बसेसमुळे मागील ३ वर्षात २४० अपघात झाले आहेत. यामध्ये अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. अपघात झालेल्या बहुतांश बस भाडेतत्त्वावर घेतल्या गेल्या असून चालक कंत्राटीपद्धतीवर आहेत.
सध्या शासकीय बसेसचे वाढते अपघात पाहता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने चालकांचे प्रशिक्षण, तसेच त्यांचे मानसिक आरोग्य आणि वाहनाची तांत्रिक व्यवस्था याबाबत नियोजन केले आहे.

