• Sat. Sep 21st, 2024
मुंबईच्या जागावाटपात विश्वासात घेतलं नाही – वर्षा गायकवाड

मुंबई : महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित करताना मुंबईतील दक्षिण मध्य मुंबईच्या जागेसाठी आग्रही असलेल्या मुंबई काँग्रेसच्या पदरी निराशा आल्याने वरिष्ठ नेत्यांविरोधात प्रचंड नाराजीचे वातावरण आहे. मुंबई कॉंग्रेस विरुद्ध प्रदेश काँग्रेस असा नवा वाद उफाळून आल्याचं सध्या दिसत आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत आपली नाराजी व्यक्त केली आहे. ”मुंबईचं जे अस्तित्व आहे ते वेगळं अस्तित्व आहे. मुंबईच्या बाबतीत चर्चा करत असताना आम्हाला काही अपेक्षा होत्या. मुंबईतल्या दोन जागा सोडण्याचं काहीच कारण नव्हतं. मुंबईच्या जागावाटपात मला विश्वासात घेतलं नाही. प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की आपला पक्ष उमेदवार किंवा पक्ष विजयी झाला पाहिजे. यंदाची निवडणूक खूप महत्त्वाची आहे. ही निवडणूक लोकशाही तसेच संविधान वाचवण्यासाठीची आहे”, असं गायकवाड यांनी बोलून दाखवलं आहे.”प्रत्येकाला लढण्याची इच्छा आहे. काँग्रेसच्या माध्यमातून साऊथ सेंन्टरमध्ये आम्ही काम केलं. आम्हाला देखील वाटतं की आमचं पण तिथे खूप मोठं संघटन आहे. नॉर्थ-वेस्ट तसेच नॉर्थ-इस्टमध्ये देखील आमचं मोठं संघटन आहे. त्यामुळे प्रत्येकाला असं वाटतं की, आम्हाला तिकीट मिळालं पाहिजे. त्याबाबतीत आमचा काही दुजाभाव नाहीय. तेजश्री घोसाळकर आणि अभिषेक घोसाळकरांबद्दल देखील मला नितांत आदर आहे. पण पक्षाने काही निर्णय घेतले, तर ते स्विकारावे लागतात. ज्यावेळी आघाडी असते त्यावेळी मी सातत्याने सांगत असते की, काही गोष्टींचा त्याग देखील करावा लागतो”, असंही बोलून गायकवाड यांनी आपल्या मनातली सल बोलून दाखवली.
श्रीकांत शिंदेंच्या विजयासाठी पूर्वेश सरनाईकांची रणनीती, कल्याणमध्ये निरीक्षक नियुक्त

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला मुंबईत दोन जागा मिळाव्यात, अशी भूमिका मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती. यात प्रामुख्याने उत्तर-मध्य मुंबईसह दक्षिण-मध्य मुंबई काँग्रेसला मिळावी, अशी पक्षाची मागणी होती. मात्र, दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघासाठी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) उमेदवार अनिल देसाई यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे त्या जागेऐवजी मुंबई काँग्रेसला उत्तर मुंबईची जागा देण्यात आली आहे. ही जागा निश्चित करताना मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांना विचारात न घेतल्याने त्यांनी दिल्लीत पक्षनेतृत्वाकडे राज्यातील नेतृत्त्वाविरोधात नाराजी व्यक्त केल्याचे समजते.

दरम्यान, बुधवारी या जागासंदर्भात पुन्हा बैठकांचे सत्र सुरू असल्याची माहिती पक्षातील सूत्रांकडून देण्यात आली. दिवंगत शिवसेना नेते अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजश्री घोसाळकर यांनी वर्षा गायकवाड यांची भेट घेऊन उत्तर मुंबईतून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली. गायकवाड यांनी घोसाळकर यांना ही जागा सोडण्यास काहीच हरकत नसून, त्याबदल्यात काँग्रेसला जागा मिळेल का, असा प्रतिप्रश्न केल्याचेही कळते. गायकवाड यांनी उत्तर मुंबई शिवसेनेला सोडण्यास आधीपासून तयारी असल्याचे स्पष्ट करत उत्तर-मध्य आणि दक्षिण-मध्य या दोन जागांवर काँग्रेस लढण्यास आग्रही असल्याचेही सांगितले. मात्र, जागावाटप जाहीर झाल्याने उमेदवारीवर आता निर्णय केवळ संबंधित पक्षश्रेष्ठीच घेणार असल्याने याविषयीचा निर्णय उद्धव ठाकरे आणि काँग्रेस हायकमांडच घेऊ शकते, असेही गायकवाड यांनी घोसाळकर यांना सांगितल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. दरम्यान, या भेटीनंतर घोसाळकर या आपल्या कार्यकर्त्यांसह पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर भेट घेण्यास गेल्या. मात्र, या भेटीत काय झाले, हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed