• Sun. Sep 22nd, 2024
भिवंडीत पवारांनी उमेदवार जाहीर केला पण काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा तीव्र विरोध, ‘फाईट’ची तयारी!

म.टा. प्रतिनिधी, भिवंडी : भिवंडी मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाकडून सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज झालेल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढण्याचा पवित्रा घेतला आहे. भिवंडी काँग्रेससाठी महत्त्वाचा मतदारसंघ असून यामध्ये मैत्रीपूर्ण किंवा अपक्ष लढण्याची तयारीत असल्याची घोषणा भिवंडीतील काँग्रेसकडून इच्छुक उमेदवार दयानंद चोरगे यांनी केली आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीतील मित्रपक्षाकडून सुरू झालेल्या कुरघोड्यांचे आव्हान दूर करून काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांबरोबरच मतदारांचा पाठिंबा मिळवण्याचे आव्हान महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांच्यासमोर निर्माण झाले आहे.

राज्यातील काँग्रेसकडून आग्रह धरण्यात आलेल्या मतदारसंघांमध्ये भिवंडीचा समावेश असून या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये जागेसाठी मोठी रस्सीखेच होती. कोकण परिसरातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील मतदारसंघांमध्ये भिवंडी हा एकमेव मतदारसंघ काँग्रेसकडून मागण्यात आला होता.
भिवंडी शरद पवारांनी खेचली, शिंदे गटातून आलेल्या बाळ्यामामांना तिकीट, काँग्रेसची नाराजी वाढली

हा मतदारसंघ काँग्रेसला मिळणार या दृष्टीनेच काँग्रेसकडून इच्छुक असलेले दयानंद चोरगे यांनी मित्रपक्षांशी प्रचाराच्या दृष्टीने संपर्क सुरू केला होता. सुरेश म्हात्रे यांनीही वरिष्ठ स्तरावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील वरिष्ठांशी संपर्क करून आपल्या जागेसाठीची मोर्चेबांधणी सुरू केली होती. अखेर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. परंतु यामुळे नाराज झालेल्या काँग्रेसकडून बंडाचा पवित्रा घेण्यात आला आहे.
Lok sabha 2024: भिवंडीच्या जागेचा तिढा कायम; कॉंग्रेस, शरद पवार गटात उमेदवारीसाठी रस्सीखेच

स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे याविरोधात पक्षश्रेष्ठींकडे दाद मागण्यात येणार असून मैत्रीपूर्ण लढतीची तयारी केली जाणार आहे, अन्यथा पक्षातील कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार अपक्ष निवडणूक लढवणार आहे, असे शुक्रवारी भिवंडीमध्ये झालेल्या काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यामध्ये दयानंद चोरघे यांनी जाहीर केले. भिवंडीच्या जागेवरून महाविकास आघाडीतील मित्रपक्ष एकमेकांसमोर उभे ठाकल्यामुळे त्यांची समजूत घालण्याची मोठी कसरत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला करावी लागणार आहे.

उमेदवारी जाहीर होताच गोदामावर कारवाई, बाळ्यामामा म्हात्रे काय म्हणाले?

काँग्रेसमधील अंतर्गत वादाची किनार

भिवंडीमध्ये काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी आक्रमकपणे उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, परंतु ठाण्यात काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी जगजाहीर आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे ठाण्याचे उमेदवार राजन विचारे यांनी मित्रपक्षांमधील सर्व नाराज गटांना एकत्र करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यादृष्टीने सर्व गटांसोबत भेटीगाठी केल्या जात आहेत. कल्याणमध्ये काँग्रेसकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आलेला नाही. त्यामुळे कल्याणात तुर्तास महाविकास आघाडीतील उमेदवाराला मित्रपक्षांचा उपद्रव नसल्याचे समोर आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed