• Wed. Mar 11th, 2026

    Pune News: युद्धामुळे निर्माण झालेल्या तणावाचा फटका; पुण्यात वैकुंठ स्मशानभूमीतील गॅस दाहिन्या तात्पुरत्या बंद, अत्यसंस्कारावेळी अडचण!

    Pune News: युद्धामुळे निर्माण झालेल्या तणावाचा फटका; पुण्यात वैकुंठ स्मशानभूमीतील गॅस दाहिन्या तात्पुरत्या बंद, अत्यसंस्कारावेळी अडचण!

    Iran Israel War: अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत येणाऱ्या कुटुंबांना गॅस दाहिन्या बंद असल्याने आता इलेक्ट्रिक दाहिन्या किंवा पारंपरिक लाकडाच्या चितेचा पर्याय वापरावा लागत आहे.

    युद्धामुळे निर्माण झालेल्या तणावाचा फटका; पुण्यात वैकुंठ स्मशानभूमीतील गॅस दाहिन्या तात्पुरत्या बंद(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    स्नेहल निमगिरे, पुणे : इराण आणि अमेरिका, इस्त्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे पश्चिम आशियात तणावाची स्थिती आहे. या देशांतील तणावाचा परिणाम आता थेट पुण्यातही दिसू लागला आहे. गॅसचा पुरवठा कमी झाल्यामुळे नवी पेठ परिसरातील वैकुंठ स्मशानभूमी येथील गॅसवर चालणाऱ्या दाहिन्या सध्या तात्पुरत्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना पर्यायी व्यवस्था वापरावी लागत आहे.

    मध्यपूर्वेतील देश जगभराला मोठ्या प्रमाणात तेल आणि नैसर्गिक वायू पुरवतात. मात्र सध्या त्या भागात तणाव वाढल्यामुळे ऊर्जा पुरवठ्यावर काही प्रमाणात परिणाम झाला आहे. त्याचा परिणाम भारतातील गॅस उपलब्धतेवरही होत असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे उपलब्ध गॅस प्रामुख्याने घरगुती वापरासाठी देण्याचा निर्णय घेतला गेला आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने ५ मार्चपासून वैकुंठ स्मशानभूमीतील गॅसवर चालणाऱ्या दाहिन्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. येथे असलेल्या तीन गॅस दाहिन्या सध्या बंद आहेत. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या कुटुंबांना आता इलेक्ट्रिक दाहिन्या किंवा पारंपरिक लाकडाच्या चितेचा पर्याय वापरावा लागत आहे.

    दरम्यान, नागरिकांची अडचण होऊ नये म्हणून स्मशानभूमीत पाच इलेक्ट्रिक दाहिन्या सुरू ठेवण्यात आल्या आहेत. रोज मोठ्या संख्येने येथे अंत्यसंस्कार होत असल्याने महापालिकेकडून व्यवस्थेवर लक्ष ठेवले जात आहे.

    गॅसचा पुरवठा पुन्हा सुरळीत झाल्यानंतर गॅस दाहिन्या सुरू केल्या जातील, अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे. मात्र आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम आता स्थानिक सेवांवरही होत असल्याचं या प्रकारातून स्पष्ट होत असून आधीच जीवाभावाचा माणूस गेल्याच्या दु:खात असणाऱ्या कुटुंबीयांना अंत्यसंस्कारासाठी वेटिंग थांबवण्याची दुर्दैवी वेळ ओढावत आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा