Iran Israel War: अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत येणाऱ्या कुटुंबांना गॅस दाहिन्या बंद असल्याने आता इलेक्ट्रिक दाहिन्या किंवा पारंपरिक लाकडाच्या चितेचा पर्याय वापरावा लागत आहे.
मध्यपूर्वेतील देश जगभराला मोठ्या प्रमाणात तेल आणि नैसर्गिक वायू पुरवतात. मात्र सध्या त्या भागात तणाव वाढल्यामुळे ऊर्जा पुरवठ्यावर काही प्रमाणात परिणाम झाला आहे. त्याचा परिणाम भारतातील गॅस उपलब्धतेवरही होत असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे उपलब्ध गॅस प्रामुख्याने घरगुती वापरासाठी देण्याचा निर्णय घेतला गेला आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने ५ मार्चपासून वैकुंठ स्मशानभूमीतील गॅसवर चालणाऱ्या दाहिन्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. येथे असलेल्या तीन गॅस दाहिन्या सध्या बंद आहेत. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या कुटुंबांना आता इलेक्ट्रिक दाहिन्या किंवा पारंपरिक लाकडाच्या चितेचा पर्याय वापरावा लागत आहे.
दरम्यान, नागरिकांची अडचण होऊ नये म्हणून स्मशानभूमीत पाच इलेक्ट्रिक दाहिन्या सुरू ठेवण्यात आल्या आहेत. रोज मोठ्या संख्येने येथे अंत्यसंस्कार होत असल्याने महापालिकेकडून व्यवस्थेवर लक्ष ठेवले जात आहे.
गॅसचा पुरवठा पुन्हा सुरळीत झाल्यानंतर गॅस दाहिन्या सुरू केल्या जातील, अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे. मात्र आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम आता स्थानिक सेवांवरही होत असल्याचं या प्रकारातून स्पष्ट होत असून आधीच जीवाभावाचा माणूस गेल्याच्या दु:खात असणाऱ्या कुटुंबीयांना अंत्यसंस्कारासाठी वेटिंग थांबवण्याची दुर्दैवी वेळ ओढावत आहे.
