विजय शिवतारे हे मुंबई येथील बैठक आटपून पुण्यात पोहोचले. पुण्यातील पत्रकारांसोबत त्यांनी संवाद साधला. गेले काही दिवस विजय शिवतारे यांनी पवार घरण्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. बारामतीतून पवारांची सत्ता हद्दपार करण्याचा चंग त्यांनी बांधला होता. काहीही झाले तरी बारामतीमधून लढणारच, असा निर्धार व्यक्त करून त्यांनी मतदारसंघात भेटीगाठीही सुरू केल्या होत्या. परंतु मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार यांच्या भेटीनंतर त्यांची भाषा काहीशी मवाळ झाली.
विजय शिवतारे म्हणाले, मी शनिवारी मतदारसंघातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. दरम्यान मुंबईत झालेल्या बैठकी बाबत मी त्यांना सांगणार आहे. त्यांची मते जाणून घेणार आहे.
पवार विरोधी पाच लाख मतदार आहेत असे तुम्ही म्हणाला आणि पवारांचा बारामती हा सातबारा नाही असेही म्हणाला होतात त्यावर तुमची भूमिका काय? यावर बोलताना विजय शिवतारे म्हणाले, “राजकारणात आम्ही स्वतःसाठी नाही तर जनतेसाठी लढत असतो. राजकारणात कोणीच कुणाचा कायमचा शत्रू आणि मित्र नसतो. प्रमुख कार्यकर्त्यांशी बोलून त्यांचे मत काय आहे हे जाणून घेणार ते निगेटिव्ह असेल किंवा पॉझिटिव्ह असेल, गरज वाटली तर प्रमुख कार्यकर्त्यांना घेऊन मुख्यमंत्र्यांना पुन्हा भेटणार”
अजित पवार यांच्यावरील प्रश्नाला शिवतारेंनी हात जोडले
बारामती लोकसभा लढण्याचा निर्णय जनतेचा आवाज होता. त्यांचा आवाज ऐकून मी हे पाऊल उचललं होतं. मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही. त्यामुळे मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी बोलणार आहे. तसेच बैठकीनंतर आपला नरमाईचा सूर दिसतोय असे शिवतारेंना विचारल्यावर, “आता जास्त बोललं की तुम्ही परत तेच शब्द दाखवणार” असे म्हणत अजित पवार यांच्यावरील प्रश्नाला शिवतारेंनी हात जोडले.