महाविकास आघाडीशी फारकत घेत प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी सकाळी आपले नऊ उमेदवार जाहीर केले. त्यानंतर संजय राऊत यांनी आंबेडकर यांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या भाजपला फायदा होईल असे पाऊल उचलू नये, अशी प्रतिक्रिया दिली. या प्रतिक्रियेनंतर आंबेडकरांनी राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला. एक्सवर पोस्ट करून त्यांनी राऊत यांच्यावर सनसनसाटी आरोप करून प्रश्नांची सरबत्ती केली. त्याच पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत राऊत यांनी आंबेडकरांच्या आरोपांना सविस्तर उत्तरे दिली.
सगळे काही सकारात्मक होते पण….
उद्धव ठाकरे शरद पवार नाना पटोले असे प्रमुख नेते जागा वाटपासंबंधी चर्चा करत होते. वंचितला आम्ही पहिल्या दिवसांपासून सन्मानाने वागवलं. त्यांना ४ जागांचा प्रस्ताव होता. अकोल्यासह ३ जागा हा आमचा प्रस्ताव होता. त्यामध्ये आम्ही आमची रामटेकची विद्यमान जागाही देणार होतो. काँग्रेसही एक जागा देणार होते. अतिशय सकारात्मक चर्चा होत होती. ही चर्चा महाविकास आघाडीतील नेते आणि त्यांच्यात होत होती, केवळ मीच त्यात होतो, असे नाही. दोन दिवसांपूर्वी तर आम्ही त्यांना पाच जागा देऊ, असेही सांगत होतो, असे सांगत सगळे काही सकारात्मक असूनही आंबेडकरांनी वेगळी भूमिका घेतल्याचे राऊत यांनी अप्रत्यक्षपणे सांगितले.
भाजपला अप्रत्यक्ष मदत होईल, असे कुणी वागू नये
जे लोक संविधान संपवू पाहतायेत, त्यांना अप्रत्यक्ष मदत होईल, असे कुणी वागू नये. आमची चर्चा अत्यंत चांगल्या वातावरणात होत होती. बाळासाहेब आंबेडकर हे आम्हा सगळ्यांना प्रिय आहे. वंचित आजही आमच्यासोबत हवी, अशीच आमची भूमिका आहे. वंचित-सेना युती आधी झाली होती, तेव्हा ठाकरेंनी युती केली ना… अकोल्याची जागा शिवसेनेकडे नाही, त्या जागेवर आम्ही कशाला चर्चा करू? तसेच सिल्वर ओकवर आतापर्यंत जागा वाटपावर कधीही चर्चा झाली नाही. महाविकास आघाडीची रणनीती आणि तिन्ही पक्षातील समन्वयविषयी सिल्वर ओक आणि मातोश्रीवर चर्चा झाली, असे म्हणत आपल्यावरील आरोप संजय राऊत यांनी फेटाळून लावले.
वंचितला आपण कोणत्या जागा देणार होतात?
वंचितला आपण कोणत्या जागा देणार होतात? या प्रश्नावर राऊत म्हणाले, “बंद खोलीत ज्या चर्चा झाल्या त्या आमच्यातच ठेवणार… शिवसेना त्याग करायला तयार होती. ते मोठे नेते आहेत, त्यांच्या विषयी किंतु परंतु नाहीत. ते आमच्यासोबत राहावेत, यासाठी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी प्रयत्न केले”