मविआकडून सुप्रिया सुळे विरुद्ध महायुतीकडून सुनेत्रा पवार अशीच थेट लढत होणार होती. परंतु शिवसेनेच्या विजय शिवतारे यांनी कोणत्याही परिस्थितीत आपण लोकसभा लढवणार आणि पवारांना पर्याय देणार असे नुकतेच घोषित केले आहे. या मतदारसंघात महायुतीचे कागदावरचे गणित पक्के होते. इंदापुरात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे हे आमदार आहेत. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची पवारांविषयी नाराजी आहे, परंतु त्यांची नाराजी फडणवीस यांनी दूर केली आहे. किंबहुना उरली सुरली नाराजी दूर करण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे इंदापुरात येऊन सभा घेणार आहेत. फडणवीसांच्या दौऱ्यानंतर हर्षवर्धन पाटील-अजित पवार पॅचअप होईल असे सांगितले जात आहे. परंतु गेली २५ वर्षे हर्षवर्धन यांना सळो की पळो करून सोडणाऱ्या अजित पवार यांच्या उमेदवाराला हर्षवर्धन पाटील यांचे कार्यकर्ते साथ देतील का? हा खरा प्रश्न आहे.
विजय शिवतारे यांचे बंड अजित पवार यांच्यासाठीच येथे अडचणीचे ठरू शकते. कारण शिवतारे हे शिवसेनेचे नेते आहेत. पुरंदरमध्ये शिवतारे यांची मोठी ताकद आहे. यापूर्वी भाजप-सेना युतीमध्ये भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी त्यांचे उत्तम संबंध राहिले आहेत. ते निवडणुकीत उतरले तर शिवसेनेसह भाजपचे काही लोक त्यांना मदत करतील असे बोलले जात आहे. त्यामुळे शिवतारे निवडणुकीत उभे राहतील का? राज्यातील वरिष्ठ त्यांना थोपवतील का? असे अनेक प्रश्न सध्या अनुत्तरीत आहेत.
दौंडमध्ये आमदार राहुल कुल व राष्ट्रवादीचे नेते रमेश थोरात हे दोघेही यंदा सुनेत्रा पवार यांचा प्रचार करताना दिसून येतील. त्यामुळे दौंडबाबत सुप्रिया सुळे यांच्यासाठी चिंतेचे वातावरण आहे. सुळे यांच्याकडे तेथे सक्षम व खंबीर नेतृत्व नाही. त्यामुळे दौंड तालुक्यात त्यांना अधिक परिश्रम घ्यावे लागतील.
भोरचे आमदार संग्राम थोपटे हे सुळेंसोबत असल्याने येथे अजित पवार यांच्यावर परिश्रमाची वेळ आली आहे. खडकवासला हा शहरी भाग भाजपच्या विचारांचा आहे. तेथे सुळे कसे नियोजन करतात, हा औत्सुक्याचा भाग आहे.