• Sat. Sep 21st, 2024
तापमानाच्या पाऱ्याचा चढता क्रम; राज्याला पुन्हा चटके, पुढील पाच दिवस हवामान कसे राहील?

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या पूर्वानुमानानुसार राज्यात कमाल तापमानाचा पारा चढायला सुरुवात झाली असून, शनिवारी होळीच्या आदल्या दिवशी राज्यातील तीन केंद्रांवर कमाल तापमानाने ४० अंशांचा टप्पा ओलांडला. मुंबई आणि कोकण परिसरातील तापमान पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे उतरले असले तरी आर्द्रतेमुळे उकाडा आणि अस्वस्थता कायम असल्याचे निरीक्षण मुंबईकरांनी नोंदवले.मालेगाव येथे शनिवारी राज्यात सर्वाधिक म्हणजे ४०.६ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले. शुक्रवारी मालेगाव येथे ४०.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली होती. मालेगावसोबतच शनिवारी अकोला येथे ४०.४ तर यवतमाळ येथे ४०.५ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. यवतमाळ येथे सरासरी कमाल तापमानापेक्षा ३.४ अंशांनी पारा अधिक असल्याची नोंद झाली. विदर्भात अमरावती येथे ३९, ब्रह्मपुरी येथे ३९.१, वाशिम येथे ३९.६, तर वर्धा येथे ३९.९ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले.
अजबच! रंगाने नव्हे, ‘या’ गावात खेळतात दगडांची होळी; रक्तबंबाळ होईस्तोवर होते दगडफेक अन् नंतर…
किमान तापमान विदर्भात अजूनही २० अंश किंवा त्यापेक्षा खाली असल्याने रात्रीच्या आणि दिवसाच्या तापमानात मोठा फरक नोंदला जात आहे. विदर्भात किमान तापमान सरासरी किमान तापमानापेक्षा कमी होते. त्यामुळे काही केंद्रांवर दोन्ही तापमानातील फरक २० अंश होता. मराठवाड्यातही परभणी येथे ३९.१, बीड येथे ३८.५, नांदेड येथे ३८.४ अंश सेल्सिअस कमाल तापमान होते. मध्य महाराष्ट्रातही पारा चढा असून, जळगाव येथे ३९.७, सोलापूर येथेही ३९.७, सांगली येथे ३८, नाशिक येथे ३७.३, पुणे येथे ३७.७ कमाल तापमान नोंदले गेले.

राज्यातील या तीनही विभागांच्या तुलनेत कोकणात पश्चिमी वाऱ्यांनी कमाल तापमानात घट झाली आहे. मात्र आर्द्रतेमुळे अस्वस्थता वाढली आहे. पहाटेच्या वेळी आर्द्रेतेचे प्रमाण ८० टक्क्यांहून अधिक असून, दुपारच्या सुमारास ५५ ते ६० टक्क्यांदरम्यान आहे. कुलाबा येथे शनिवारी ३१ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले, तर सांताक्रूझ येथे ३२.६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. शुक्रवारपेक्षा कुलाबा येथे १ अंशांनी कमी, तर सांताक्रूझ येथे २.८ अंशांनी कमाल तापमान कमी नोंदले गेले. पण दिवसभरात आर्द्रता कायम असल्याने तापमानात झालेली घट फारशी दिलासादायक ठरली नाही. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार शुक्रवारप्रमाणे शनिवारीही मुंबईच्या उष्णतेचा निर्देशांक ३५ ते ४५ अंश सेल्सिअस या श्रेणीमध्ये होता.

पुढील पाच दिवसांत स्थिती काय?

पुढील पाच दिवसांमध्ये मध्य भारतात २ ते ३ अंशांनी कमाल तापमानात वाढ होईल, असा अंदाज आहे. २६ आणि २७ मार्चला कोकण विभागामध्ये अधिक उष्ण आणि आर्द्रता जाणवू शकेल. गुरुवार २८ ते रविवार ३१ मार्चदरम्यानच्या चारपैकी फक्त एक-दोन दिवस विदर्भ, मराठवाड्यात केवळ ढगाळ वातावरणाची शक्यता जाणवेल, अशी शक्यता निवृत्त हवामान विभाग अधिकारी माणिकराव खुळे यांनी वर्तवली. त्यामुळे अवकाळी पावसाच्या दिशाभूल करणाऱ्या माहितीने घाबरू नये, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed