या मतदारसंघात रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर, रत्नागिरी, चिपळूण; तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ-मालवण, कणकवली, सावंतवाडी हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. यापैकी कुडाळ-मालवण व राजापूर हे दोन मतदारसंघ ठाकरे गटाकडे आहेत. हे दोन अपवाद वगळता उर्वरित चारही विधानसभा मतदारसंघ शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस-भाजप या महायुतीच्या ताब्यात आहेत. कुडाळ मालवण मतदारसंघ हा ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक; तर कणकवली देवगड मतदारसंघ भाजपचे नीतेश राणे यांच्याकडे आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे दीपक केसरकर, लांजा-राजापूर मतदारसंघात ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी, रत्नागिरीत उदय सामंत; तर चिपळूण-संगमेश्वरमध्ये राष्ट्रवादीचे शेखर निकम आमदार आहेत.
मतदारांचे यापूर्वीचे कौल मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यानंतर २००९मधील पहिल्याच निवडणुकीत काँग्रेसचे नीलेश राणे यांनी ३ लाख ५३ हजार ९१५ मते मिळवून विजय मिळवला होता. त्या वेळी त्यांनी युतीचे सुरेश प्रभू यांचा पराभव केला होता. सुरेश प्रभू यांना ३ लाख ७ हजार १६५ मते मिळाली होती. २०१४च्या निवडणुकीत शिवसेनेचे विनायक राऊत ४ लाख ९३ हजार ८८ मते घेऊन विजयी झाले होते. या निवडणुकीत नीलेश राणे यांना ३ लाख ४३ हजार ३७ मते मिळाली होती. २०१९मध्ये शिवसेनेच्या विनायक राऊत यांना ४ लाख ५८ हजार २२ मते मिळाली व ते पुन्हा विजयी झाले; तर नीलेश राणे यांना २ लाख ७९ हजार ७०० मते मिळाली व ते पराभूत झाले. गोवा महामार्ग, प्रकल्प हेच मुद्दे कोकणात रोजगार, उद्योग हाच निवडणुकीत प्रचाराचा मुख्य मुद्दा राहील. या भागातील पर्यटनवाढीची संधी लक्षात घेता रत्नागिरी जिल्ह्यात अनेक पर्यटनस्थळांवर असलेल्या सोयी-सुविधांचा अभाव; तसेच कोकणात मोठ्या प्रकल्पांना होणारा विरोध याचे पडसादही मतदानात उमटतात. मालवण येथील सी वर्ल्ड प्रकल्प, जैतापूर येथील अणुऊर्जा प्रकल्प व त्यानंतर राजापूर येथील रिफायनरी प्रकल्पांना झालेला विरोध, कोकणातील बेरोजगारी हे प्रश्न आहेच; पण सर्वांत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुंबई-गोवा महामार्गाची रखडपट्टी हा आहे.
या मुद्द्यांभोवतीच यंदाची निवडणूक फिरणार आहे. सन १९५२मध्ये काँग्रेसचे मोरेश्वर जोशी; तर १९५७, १९६२, १९६७मध्ये समाजवादी विचारांचे बॅरिस्टर नाथ पै यांनी तीनदा विजय मिळवले. त्यानंतर १९७१, १९७७, १९८०, १९८४, १९८९ असे तब्बल पाच वेळा माजी केंद्रीय मंत्री व कोकण रेल्वेचे शिल्पकार मधू दंडवते यांनी या राजापूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. १९९१मध्ये येथून काँग्रेसचे सुधीर सावंत निवडून आले. त्यानंतर माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी या मतदारसंघाचे चार वेळा प्रतिनिधित्व केले.