२०१४ आणि २०१९ मध्ये भाजपच्या बाजूनं वातावरण होतं. युफोरिया होता. आता तशी परिस्थिती नाही. त्यामुळेच त्यांना नेत्यांची पळवापळवी करावी लागतेय, अशा शब्दांत प्रकाश आंबेडकरांनी भाजपचा समाचार घेतला. संविधान बदलण्यासाठीच ४०० जागा गरजेच्या असतात. सरकार चालवण्यासाठी ३०० जागादेखील पुरेशा असतात, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
काय बदलायचं, काय बदलायचं नाही ते सत्ताधाऱ्यांच्या हाती आहे. पण मला १९५० मध्ये आरएसएसनं घेतलेली शपथ आजही आठवते. आम्हाला संधी मिळाली तर आम्ही संविधान बदलू अशी शपथ त्यांच्याकडून घेण्यात आली होती. त्याचे रेकॉर्ड उपलब्ध आहेत, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.
महाविकास आघाडीला त्यांच्यातील जागावाटपाचा तिढा सोडवता येत नाही. त्यांनी आम्हाला ४ जागा देऊ केल्या. त्या जागा मी त्यांना परत करतो. मविआनं २६ मार्चपर्यंत काय तो निर्णय घ्यावा. आम्हाला कळवावं. अन्यथा २६ मार्चला आम्ही आमची भूमिका जाहीर करू. २७ मार्चला मी अकोल्यातून निवडणूक अर्ज दाखल करणार आहे, अशी माहिती आंबेडकरांनी दिली.
काँग्रेसला ७ जागांसाठी आम्ही दिलेली ऑफर कायम आहे. काँग्रेसनं आम्हाला ७ जागांची यादी द्यावी. आमच्यामुळे मदत होईल. काँग्रेसचे उमेदवार निवडून येतील अशा ७ जागांची माहिती काँग्रेसनं आम्हाला द्यावी. आम्ही त्यांना निश्चितपणे मदत करू, असं आंबेडकर म्हणाले. ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस यांच्यात काही जागांवरुन गोंधळ आहे. काही ठिकाणी ठाकरेंनी परस्पर उमेदवार जाहीर केले आहेत, याबद्दल पत्रकारांनी विचारलं असता आमच्यामुळे तरी मविआमध्ये कोणताही गोंधळ नाही. जागावाटपात आमत्यामुळे कोणतीही बाधा आलेली नाही, असं आंबेडकरांनी सांगितलं.