• Sun. Jun 7th, 2026

    शिंदेंच्या ठाण्यात कमळ फुलवण्याचा चंग; मोदी-शहांनी राजस्थानला पाठवलं, ‘गुलाबी स्वप्न’ भंग?

    शिंदेंच्या ठाण्यात कमळ फुलवण्याचा चंग; मोदी-शहांनी राजस्थानला पाठवलं, ‘गुलाबी स्वप्न’ भंग?

    ठाणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यातून लोकसभेवर जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्यावर आता भारतीय जनता पक्षानं महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. सहस्रबुद्धे यांच्याकडे राजस्थानच्या निवडणूक प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. सहस्रबुद्ध भाजपच्या राष्ट्रीय कार्य समितीचे सदस्य आहेत.

    ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे राजन विचारे खासदार आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर राजन विचारेंनी ठाकरेंची साथ दिली. त्यामुळे लोकसभेला इथून त्यांनाच उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. विचारेंना लढत देऊ शकेल असा तुल्यबळ उमेदवार अद्याप तरी मुख्यमंत्री शिंदेंना मिळालेला नाही. याशिवाय मित्रपक्ष भाजपही ठाण्यातून लढण्यास उत्सुक आहे. ठाणे भाजपचाच बालेकिल्ला होता. आताही इथे भाजपची चांगली ताकद असल्याचं भाजपकडून सांगण्यात येत आहे.
    राज ठाकरेंचा प्रस्ताव, शिंदेंचा ‘मनसे’ विरोध; राज्य भाजपचे प्रयत्न फेल, ‘शाही’ तोडगा निघणार?
    ठाण्यातून लोकसभेसाठी विनय सहस्रबुद्धे उत्सुक आहेत. सहस्रबुद्धे सुशिक्षित आहेत. ते राज्यसभेचे माजी खासदार आहेत. भाजपच्या थिंक टँकमधील नेते अशी त्यांची ओळख आहे. भाजपच्या वरच्या फळीतील नेत्यांमध्ये त्यांची गणना होते. पण ठाणे लोकसभा मतदारसंघाशी त्यांचा फारसा परिचय नाही. गेल्या काही महिन्यांपासून सहस्रबुद्धे मतदारसंघात सक्रिय झाले. त्यांनी मतदारसंघात फिरण्यास सुरुवात केली.

    ठाण्यात पुन्हा कमळ फुलवायचं असा चंग सहस्रबुद्धेंनी बांधला होता. त्यासाठी त्यांनी दौरे, बैठका, गाठीभेटी सुरू केल्या. पण आता त्यांच्याकडे राजस्थानची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळ आता सहस्रबुद्धे यांना प्रचारकार्य थांबवून गुलाबी शहर अशी ओळख असलेल्या जयपूरकडे उड्डाण करावं लागणार आहे. पक्षाला राजस्थानात घवघवीत यश मिळवून देण्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्यामुळे ठाण्यात ठाण मांडून बसलेल्या सहस्रबुद्धेंना राजस्थानला जावं लागेल.
    शिवसेना सोडण्यास तयार, पण लोकसभा लढवणारच! बापू उमेदवारीवर ठाम, अजितदादांचं टेन्शन वाढणार
    ठाणे लोकसभा मतदारसंघातून निवडून येऊन खासदार होण्याची, शक्य झाल्यास पुढील मंत्रिमंडळात एन्ट्री घेण्याची सहस्रबुद्धे यांची स्वप्नं होती. पण ही सगळी गुलाबी स्वप्नं आता अधुरीच राहण्याची चिन्हं आहेत. सहस्रबुद्धेंना ठाणे सोडून गुलाबी शहर असलेल्या जयपूरला जाऊन पक्षानं दिलेलं काम सुरू करावं लागणार आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed