• Sat. Sep 21st, 2024
आई-बापाला मदत करण्यासाठी शेतात गेले, तिथेच अनर्थ घडला, पोटच्या दोन्ही लेकरांचा बुडून मृत्यू

शुभम बोडके, नाशिक : शेतात आलेल्या माकडांना हुसकावण्याच्या नादात शेततळ्यात पाय घसरून पडल्याने दोन शाळकरी मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने खामखेडा सह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, खामखेडा येथील बुटेश्वर शिवारात शेतकरी गणेश संतोष आहेर हे आपल्या डोंगराला लागून असलेल्या शेतात राहतात. त्यांची दोन्ही मुलं तेजस आहेर (वय १२) आणि मानव आहेर (वय ८) हे काल बुधवारी दुपारी शेतात उन्हाळी कांदा काढणी सुरू असल्याने आई वडिलांना मदतीसाठी शेतात होते. दुपारच्या वेळेस जंगलातून शेतात आलेल्या वानराना हुसकावून लावण्यासाठी त्यांच्या पाठीमागे ते गेले. वानरे हुसकून आल्यानंतर जंगलाला लागून असलेल्या सदाशिव शेवाळे यांच्या शेततळ्यात पाणी पाहायला गेले असता मोठा भाऊ तेजस याचा पाय घसरल्याने तो शेततळ्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी मानव यांनी हात दिला. मात्र तोही शेततळ्यात घसरला.

दोघांसोबत असलेल्या चार वर्षीय चुलत बहिणीने शेतात पळत येत घरच्यांना ही घटना सांगितली. शेतात कांदे काढणी करत असलेले केदा आहेर व इतरांनी शेततळ्याकडे धाव घेतली. शेजारील शेतकरी हरेश शेवाळे यांनी शेततळ्यातून दोघा मुलांना बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत दुर्दैवाने दोघांचाही बुडून मृत्यू झाला होता. तेजस आहेर हा खामखेडा येथील जनता विद्यालयात इयत्ता सहावीत तर मानव आहेर हा जिल्हा परिषद शाळा थळवस्ती येथे इयत्ता दुसरीत शिकत होता. गणेश आहेर यांच्या दोन्ही मुलांच्या दुर्दैवी मृत्यूने गाव व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed