• Sat. Sep 21st, 2024
पालघरमध्ये भटक्या श्वानांची दहशत, तब्बल २२ हजार जणांवर हल्ले, निर्बीजीकरण बंद असल्याने उपद्रव वाढला

म. टा. वृत्तसेवा, पालघर : पालघर जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. एप्रिल २०२३ ते जानेवारी २०२४ दरम्यान भटक्या कुत्र्यांनी २२ हजार ७३२ लोकांवर हल्ले करून त्यांना जखमी केले आहे. म्हणजेच दररोज ६३ लोकांना कुत्रे चावले आहेत. या काळात ५१ जणांना माकडांनी चावे घेतले असून, मांजरीही यात मागे नाहीत. २,१०८ लोकांना मांजरींनी चावे घेण्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे भटक्या कुत्र्यांचा, मांजरींचा उपद्रव हा गंभीर विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
पार्क केलेल्या ई बाईकच्या बॅटरीचा स्फोट, ३ जण जखमी, नेमकं काय घडलं?
भटक्या कुत्र्यांची संख्या सर्वत्र बेसुमार वाढत चालली आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतही कुत्र्यांमुळे होणाऱ्या उपद्रवावर चर्चा झाली. कुत्र्यांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी जिल्ह्यातील सफाळे, दांडी, डहाणू आदी प्राथमिक आरोग्य केंद्रांत निर्बीजीकरण शस्त्रक्रिया होतात. नुकत्याच सादर झालेल्या जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात २५ लाखांवरून ८० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. तरीही हे प्रयत्न अपुरे पडत असल्याचे दिसून येत असून, गावागावांत नागरिकांना भटक्या कुत्र्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. चिंचणी गावातील समुद्रकिनाऱ्यावरही भटक्या कुत्र्यांची टोळकी तयार झाल्याचे नागरिक सांगतात.पालघर जिल्हा परिषदेअंतर्गत ४६ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ११हजार १९६ लोकांना भटक्या कुत्र्यांनी चावे घेतल्याचे दिसून आले. मांजरींनी १,३७४ लोकांना माकडाने २२ लोकांना अन्य प्राणी, सरपटणारे प्राण्यांनी १,०२६ लोकांना चावे घेतल्याची नोंद करण्यात आली आहे. पालघर जिल्हा शल्य चिकित्सक विभाग अंतर्गत चार उपजिल्हा रुग्णालय आणि नऊ ग्रामीण रुग्णालय अंतर्गत एकूण ११,५३६ लोकांना कुत्र्यांनी चावे घेतल्याचे समोर आले असून ७३४ जणांना मांजरींनी तर २९ जणांना माकडांनी चावी घेतले आहेत. १२१ जणांना अन्य प्राण्यांनी चावे घेतल्याचे नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण ६,९७० लोकांवर प्राथमिक उपचार तर अन्य १६ हजार ९८२ लोकांवर द्वितीय श्रेणीचे उपचार करताना रेबीजप्रतिबंधक लशींचे डोस देण्यात आले. तृतीय श्रेणीच्या १,९२४ रुग्णांना रेबीजप्रतिबंधक इंजेक्शनबरोबर इमिनोग्लोब्युलीन इंजेक्शनचा पुरवठा उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयांतून करण्यात आला आहे.

निर्बीजीकरण बंदच


पालघर नगरपरिषद क्षेत्रात पालघर-मनोर, पालघर-माहीम, पालघर-टेंभोडे, पालघर-लोकमान्य नगर, पालघर-नवली वेवूर, पालघर-बोईसर आदी रस्त्यांवर, चिंचणी गाव या भागात किमान ७०० ते ७५० भटके कुत्रे आहेत. कुत्र्यांचे निर्बीजीकरण होत नसून त्यामुळे संख्या वाढतच चालली आहे. निर्बिजीकरण शस्त्रक्रिया करण्यासाठी ठाणे येथील एका कंपनीला ठेका देण्यात आला असून त्यांनी अद्याप निर्बीजीकरण प्रक्रिया सुरूच केली नसल्याचे समजते. मग ठेकेदाराला त्याचे बिल दिले कसे जाते, असा प्रश्न त्रस्त नागरिक विचारत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed