• Sat. Sep 21st, 2024
बैठकीतूनच शरद पवारांनी महादेव जानकरांना फोन लावला, माढ्याची कोंडी फोडली, गणित ठरलं!

सोलापूर : राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर आणि शरद पवार यांच्यात वाटाघाटी झाल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवार आणि महादेव जानकर यांच्यात चर्चा झाली असून माढ्याची जागा सोडण्याची तयारी पवारांनी दाखवली आहे. दोन दिवसात यावर अधिकृत निर्णय होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. महादेव जानकर यांना माढ्याची जागा देऊन त्याबदल्यात बारामतीत जानकर यांची मदत घेता येईल, असा पवारांचा होरा असल्याचं बोललं जातंय. कारण बारामती लोकसभेत धनगर समाजाची मते निर्णायक आहेत. ही मते सुप्रिया सुळे यांना मिळाल्यास विजयी नौका गाठणं सुलभ होईल, असं बोललं जातं.

शरद पवार हे मागील काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि रासपचे अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर यांच्याशी सातत्याने संवाद साधतायेत. महायुतीत नाराज असलेले महादेव जानकर यांचीही घुसमट होते आहे. हीच नाराजी हेरून शरद पवार यांनी जानकर यांच्याशी संपर्क करून महाविकास आघाडीत येण्याचं आवतान दिलं. त्याचवेळी आपल्या कोट्यातून जानकर यांना माढ्याची जागा सोडण्याची तयारीही त्यांनी दर्शवली आहे.
महायुतीच्या बैठकीचं निमंत्रण नाही, जानकर महाविकास आघाडीच्या वाटेवर, पवारांचा गेम प्लॅन काय?

शरद पवार हे आपल्या कोट्यातून माढ्याची जागा देणार

महादेव जानकर महाविकास आघाडीत येणार हे जवळपास निश्चित झालं आहे. महाविकास आघाडीच्या कोट्यातून वंचित आघाडीला ३ ते ४ जागा सोडण्यात येणार असल्याची माहिती आहे. दुसरीकडे महादेव जानकर यांच्या रासपला शरद पवार हे आपल्या पक्षाच्या कोट्यातून माढ्याची जागा सोडण्यास तयार असल्याची माहिती आहे. महादेव जानकर हे मागील काही काळापासून भाजपसह महायुतीवर नाराज असल्याचं दिसत आहे. जानकर यांनी अनेकदा भाजपविरोधात वक्तव्ये करत आपली नाराजी जाहीरपणे व्यक्तही केली होती. महादेव जानकर यांना महाविकास आघाडीकडे खेचण्यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घेतला असल्याचे समजते.
बारामतीसाठी शरद पवारांनी हुशारीने टाकाल MJ डाव; बारामतीत अजित पवार तर माढामध्ये भाजपला बसणार धक्का

माढा मतदारसंघ नेहमीच चर्चेत

२००९ साली माढा लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. सोलापूर जिल्ह्यातील चार आणि साताऱ्यातील दोन विधानसभा मतदारसंघाचा समावेश या लोकसभेसाठी आहे. हा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासूनच चर्चेत आहे. आतापर्यंतच्या तीन निवडणुकीत राजकीय संघर्षच पाहावयास मिळाला. कारण संपूर्ण मतदारसंघात राज्यातील दिग्गज नेते आहेत. प्रत्येकाचा सवतासुभा आहे. राजकीय पक्षापेक्षा त्यांची स्वतःची व्होट बँक आहे. त्यामुळे हा मतदारसंघ नेहमीच चर्चेत राहिला. आताही तशीच स्थिती निर्माण झालेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed