• Thu. Jun 18th, 2026

    ज्यांच्यामुळे सर्व पदं मिळाली, त्यांचं नाव पत्रात लिहिण्याचं धाडस नाही, अजितदादांना डिवचलं

    ज्यांच्यामुळे सर्व पदं मिळाली, त्यांचं नाव पत्रात लिहिण्याचं धाडस नाही, अजितदादांना डिवचलं

    मुंबई : सत्तेत जाऊन देखील जनता प्रतिसाद देत नाही या जाणिवेतून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला खुले पत्र लिहिले. परंतु शरद पवारांचं नाव पत्रात लिहिण्याचं धाडस अजितदादांमध्ये नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार गटाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केली.

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यासोबत जाताना वेगळा विचार केला, त्याबाबत अनेक माध्यमांतून विविध प्रकारे आजही चर्चा होत आहे. याविषयीची नेमकी भूमिका राज्यातील सन्माननीय नागरिकांपर्यंत पोहोचावी, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला खुले पत्र लिहिले. राजकीय पदार्पण, त्यानंतर मिळालेली मंत्रिपदाची संधी, पक्षसंघटना यावर भाष्य करताना अजित पवार यांनी शरद पवार यांचा उल्लेख करणे खुबीने टाळले. हाच धागा पकडून शरदचंद्र पवार गटाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.
    लोकप्रतिनिधी म्हणून काम करायचं तर सत्तेची जोड हवी, शिवसेना-भाजपशी युतीमागील भूमिका अजित पवारांकडून स्पष्ट

    राजकारणात आल्यानंतर खासदार,आमदार, मंत्री, अनेक वेळा उपमुख्यमंत्री पद हे शरद पवारांमुळे मिळालं, हे पत्रामध्ये लिहिण्याचं धाडस अजितदादा दाखवू शकले नाही. जर लोकप्रतिनिधी म्हणून काम करायचं असेल तर त्याला सत्तेची जोड हवी हे त्यांचं वाक्य पूर्णपणे चुकीचं आहे. हे वाक्य जर खरं असतं तर ८४ च्या निवडणुकीत भाजपमधून निवडून आलेले दोन खासदार एके पटेल व जंगा रेड्डी यांनी काँग्रेस पक्षाला समर्थन दिलं असतं आणि तुम्ही लिहिलेला डायलॉग मारला असता. परंतु तसं झालं नाही आणि देशभरात आजही अनेक लहान-मोठे पक्ष विरोधामध्ये कार्यरत आहेत याची आठवण महेश तपासे यांनी करून दिली.
    युगेंद्र पवार यांचं राजकारणात पाऊल, शरद पवार गटाला पाठिंबा, सुप्रिया सुळे यांचा लोकसभेचा प्रचार करणार

    आपण सत्तेमध्ये जनतेच्या भल्यासाठी सामील झालो हे अगदी महाराष्ट्राला न पटणारं कारण तुम्ही दिलं. संविधान रक्षणाचे जे संघर्षमय कर्तव्य शरद पवार पार पडत आहेत. अशा वेळेस त्यांच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही उभे राहिला हवे होतात, अगदी हे कर्तव्य देखील तुम्ही विसरलात, असेही तपासे म्हणाले.
    Jayant Patil: अजित पवारांअगोदर जयंत पाटील यांना उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर होती, नेमका कुणी केला गौप्यस्फोट?

    अजित पवार यांनी पत्रात काय म्हटले आहे?

    विचारधारा, ध्येयधोरणे यांच्याशी कोणतीही तडजोड न करता विकासकामे वेगाने मार्गी लागावेत, याच उद्देशाने सत्तेत जाण्याची भूमिका घेतली. यात कोणाचाही अवमान करणे, कोणाच्याही भावना दुखाविणे, कोणालाही दगा देणे किंवा पाठीत खंजीर खुपसणे असा कोणताही उद्देश अजिबात नव्हता व कधीच नसेल.

    कायमच वडीलधा-यांविषयी आदराची भावना, समवयस्कांना सोबत घेऊन जाणे व युवकांना विविध ठिकाणी संधी देण्याचेच काम माझ्याकडून झाले आहे. आजही मी फक्त भूमिका घेतली आहे, सत्ता असेल तर मतदारसंघासह राज्यातील सर्वच विकासकामे वेगाने मार्गी लागतील ही स्वच्छ भूमिका आहे, यात कोणाचाही कसलाही अनादर करण्याचा अजिबात हेतू नव्हता व नसेल.

    अजित पवारांची डोकेदुखी वाढली, युगेंद्र पवारांची शरद पवारांना साथ

    या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली जो विकास होतो आहे, तो मला महत्वाचा वाटला. कणखर नेतृत्व व योग्य निर्णयप्रक्रीया हे त्यांचे गुण मला भावले. माझी आणि त्यांची कार्यप्रणाली मिळतीजुळती आहे, कामावर आमचे जास्त प्रेम आहे, त्यांच्यासमवेत माझ्या भविष्यातील विकासाच्या ज्या योजना आहेत, त्या अधिक प्रभावीपणे प्रत्यक्षात उतरविणे शक्य होईल, असे मला वाटल्याने मी त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

    या राज्याला विकासात अग्रेसर कसे करता येईल या उद्देशाने मी ही भूमिका स्वीकारली आहे. मी सत्तेत आल्यानंतर विकासास आलेली गती आपण अनुभवली आहे. वडीलधारी किंवा ज्येष्ठांचा अनादर करणे असा हेतू नसून भविष्यात वेगाने लोकांचे राहणीमान कसे उंचावता येईल, मुलभूत पायाभूत सुविधा अधिक सक्षम कशा करता येतील हाच विचार आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed