• Sun. Sep 22nd, 2024

मुंबई बंदरावरचे अतिक्रमण रोखणार ‘रक्षक’, प्राधिकरणाच्या भूखंडावरील प्रत्येक यार्डासाठी नेमणूक

मुंबई बंदरावरचे अतिक्रमण रोखणार ‘रक्षक’, प्राधिकरणाच्या भूखंडावरील प्रत्येक यार्डासाठी नेमणूक

मुंबई : मुंबई बंदर प्राधिकरणाची जमीन मुंबईभर पसरली आहे. त्यातील अनेक जमिनींवर अतिक्रमण झाले आहे. मात्र यापुढे अतिक्रमण होऊ नये यासाठी प्राधिकरणाने तयारी केली आहे. याअंतर्गत भूखंड, जमिनींसह प्राधिकरणाच्या विविध यार्डसाठी स्वतंत्र रक्षकांची नेमणूक होणार आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू झालेले बॉम्बे बंदर पुढे ‘बॉम्बे पोर्ट ट्रस्ट’ झाले व त्याचे नामकरण आता केंद्र सरकारने मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) म्हणून केले आहे. या बंदराकडे १ लाख चौरस मीटरहून अधिक क्षेत्रफळाची जागा आहे. त्यापैकी जवळपास ४० हजार चौरस मीटरचा भाग हा समुद्रातील बोटी येणे-जाणे करण्यासाठीचा आहे. उर्वरित भाग हा प्रत्यक्ष बंदराचा आहे. बंदरावर ६३ जहाजे उभी करण्याच्या जागा व पाच मोठे धक्के आहेत. याखेरीज मोठ्या जहाजांसाठी खोल समुद्रात ६९ नांगरणीच्या जागा आहेत. प्राधिकरणाकडे प्रत्यक्षात ९४४ हेक्टर जमीन असून ३०० हेक्टर जमिनींवर कर्मचाऱ्यांसाठी रहिवासी वसाहत, कार्यालयीन जागा, अन्य सरकारी विभागांना भाडेतत्त्वावर दिलेल्या जागा यांचा समावेश आहे.
अतिक्रमणांचा विळखा, पुणे जिल्ह्यातील १५०० हेक्टरहून अधिक गायरान जमीन संकटात
या सर्व जागांच्या सुरक्षेसाठी आता प्राधिकरणाकडून स्वतंत्र रक्षक नेमण्याची तयारी सुरू आहे. यासंबंधी मुंबई बंदर प्राधिकरणाने निविदा काढली आहे. त्याअंतर्गत भूखंड व मोकळ्या जमिनींसह बंदर प्राधिकरणाच्या मालकीतील पादचारी मार्ग, रस्ते, यार्ड, विविध प्रकारच्या वास्तू यांच्या संरक्षणासाठी सुरक्षा रक्षक नेमण्यासाठीची साडेपाच कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. दोन वर्षांच्या कालावधीसाठी या सुरक्षा रक्षकांची नेमणूक असेल. याद्वारे प्रामुख्याने अतिक्रमण रोखण्याचा प्रयत्न प्राधिकरणाकडून केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed