• Sat. Sep 21st, 2024

गूड न्यूज! ‘बदलापूर पनवेल’ला गती, वर्षभरात प्रतीक्षा संपणार, बोगद्याचे काम पूर्ण

गूड न्यूज! ‘बदलापूर पनवेल’ला गती, वर्षभरात प्रतीक्षा संपणार, बोगद्याचे काम पूर्ण

म. टा. वृत्तसेवा, बदलापूर: नवी मुंबई आणि ठाणे या दोन भागांची सीमा असलेल्या बदलापूर आणि पनवेल या शहरांना जोडणारा आणि वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अशा बदलापूर-पनवेल मार्गाच्या दोन्ही बोगद्यांचे जवळपास चार किमी खोदकाम पूर्ण झाले आहे.

१७ जुलै २०२५पर्यंत बोगद्याचे खोदकाम पूर्ण करत, त्यानंतर हा बोगदा नागरिकांच्या सेवेत आणण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या बोगद्यामुळे अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, भिवंडी आदी शहरांसाठी नवी मुंबई आणि मुंबईचा प्रवास अवघ्या ४० मिनिटांवर येणार आहे. वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात चार पदरी रस्त्यांचे दोन बोगदे तयार करण्यात येत आहेत. प्रत्येकी ४.१६ किमी असलेल्या दोन्ही बोगद्यांचे काम सध्या वेगाने सुरू असून, मंगळवारी या बोगद्याच्या कामाची पाहणी प्रकल्प संचालक सुहास चिटणीस आणि आमदार किसन कथोरे; तसेच बदलापूर पालिकेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे यांच्याकडून करण्यात आली.

दोन्ही बोगद्यांचे बदलापूर दिशेने एक किमी, तर पनवेलकडून एक किमी असे एकूण चार किमी खोदकाम करण्यात आले आहे. त्यानुसार डिसेंबरपर्यंत दोन्ही बोगद्यांचे १०० टक्के खोदकाम पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर बोगद्यातील रस्ता, विद्युतीकरण आदी तांत्रिक कामे पुढील सहा महिन्यांत पूर्ण करत जुलै २०२५पर्यंत हा बोगदा नागरिकांच्या सेवेत आणण्याचा आमचा प्रयत्न असल्याची माहिती यावेळी प्रकल्पाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.

– प्रत्येक बोगद्यात वाहतुकीसाठी चार मार्गिका

– बदलापूरजवळील बेंडशीळ येथून मुबंई-बडोदामार्गे बोगद्यातून पनवेलचा प्रवास

– या बोगद्यामुळे पनवेल २० मिनिटे, तर पुढे अटल सेतूद्वारे ४० मिनिटांत मुंबई गाठता येणार

– अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, कल्याण येथील नागरिकांचा प्रवासाचा एक तास वाचणार

– प्रस्तावित नवी मुंबई विमानतळही अवघ्या ३० मिनिटांवर येणार

– पनवेल, बदलापूर शहरांची थेट कनेक्टिव्हिटी वाढल्याने गृह, औद्योगिक क्षेत्राला चालणा मिळणार

या प्रकल्पातील सर्व तांत्रिक अडचणी दूर झाल्या असून, दोन्ही बोगद्यांची कामे वेगाने सुरू आहेत. बडोदा महामार्गावरील बदलापूर-पनवेल बोगद्यातील प्रत्यक्ष प्रवासी वाहतूक जुलै २०२५पर्यंत सुरू करण्याचे लक्ष्य आहे – सुहास चिटणीस, प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed