मुंबईला भातसा धरणातून दररोज दोन हजार दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. यापैकी सुमारे १४०० दशलक्ष लिटर पाण्यावर पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया केली जाते. पांजरापूर येथे प्रक्रिया केलेले पाणी येवई महासंतुलक जलाशयातून, मुंबई-२ व मुंबई-३ या दोन मुख्य जलवाहिन्यांमार्फत मुंबईपर्यंत वाहून आणले जाते. उर्वरित ६०० दशलक्ष लिटर पाणी येवई येथील वैतरणा/अप्पर वैतरणा या जलवाहिन्यांमार्फत शुद्धीकरण प्रक्रियेसाठी भांडुप संकुल जलशुद्धीकरण केंद्रामध्ये पाठविले जाते.
मुंबई-नाशिक महामार्गाच्या रुंदीकरणामुळे आणि सुरक्षित पाणीपुरवठ्याच्या दृष्टिकोनातून जमिनीवर कार्यान्वित असलेल्या मुख्य जलवाहिन्यांसाठी पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे आहे. त्यासाठी कशेळी ते मुलुंडदरम्यान अतिरिक्त क्षमतेसह जलबोगदा बांधण्याचे प्रस्तावत आहे, अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली.
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पालिका या जलबोगद्याचा पाणीपुरवठ्यासाठी वापर करण्यास सुरुवात करणार आहे. विद्यमान जलवाहिन्यांचे जाळे हे संरक्षित (बॅक-अप) म्हणून असेल. बोगद्यामुळे पाणीपुरवठ्यात फार मोठी वाढ होणार नसली, तरी प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट पाणीपुरवठा मालमत्ता सुरक्षित करणे हे आहे. ठाणे, पालघर, नाशिकमधून येणाऱ्या जलवाहिन्या या जमिनीवर असल्याने त्यांना धोका आहे. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या बोगद्यातून पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे, असे पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.
आपत्कालीन परिस्थितीत गरज
सुरक्षेचा उपाय म्हणून, शहराची पाणीपुरवठ्याची संरक्षित योजना आवश्यत असते. संरक्षित योजना नसते, तेव्हा आपत्कालीन परिस्थितीत पाणीपुरवठा खंडित होण्याची भीती असते. त्यामुळे नवीन संरक्षित पाण्याच्या बोगद्याची वारंवार गरज भासते आहे. याचा अनुभव पाणीकपातीच्या पार्श्वभूमीवर आला आहे. जलवाहिन्या फुटल्यामुळे गेल्या वर्षभरात शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. डिसेंबरमध्ये अंधेरीच्या वेरावली जलवाहिनीत तसेच मेट्रोच्या कामांमुळे जलवाहिन्या फुटल्या. परिणामी अंधेरी, जोगेश्वरी, जुहू आणि इतर भागातील नागरिकांना जवळपास पाच दिवस पाणीपुरवठा झाला नाही. ही बाब लक्षात घेता पर्यायी व्यवस्था आवश्यक आहे, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.