माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण लवकरच भाजप प्रवेश करतील अशी चर्चा आहे. चव्हाण यांचं वर्चस्व आणि वजन पाहता त्यांच्या पक्ष प्रवेशाला भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित राहू शकतात. काँग्रेसचे आणखी काही आमदारही चव्हाण यांच्या पाठोपाठ राजीनामा देऊ शकतात. तशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
चव्हाण भाजपसोबत का जातील?
१. वातावरण भाजपच्या बाजूनं– देशातील वातावरण भाजपच्या बाजूनं आहे. राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यानंतर त्यात भर पडली आहे. अनेक सर्वेक्षणांमधून समोर आलेली आकडेवारी सत्ताधारी भाजपच्या बाजूनं आहे. त्यामुळे भविष्यातील संधींचा विचार करता चव्हाण कमळ हाती घेऊ शकतात.
२. स्थानिक राजकारण- २०१४ मध्ये मोदी लाटेतही अशोक चव्हाण यांनी नांदेड लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला. पण २०१९ मध्ये त्यांच्या पदरी पराभव पडला. भाजप उमेदवार प्रताप चिखलीकर यांनी त्यांचा पराभव केला. पण त्यांना छाप पाडता आलेली नाही. अशा परिस्थितीत भाजपला चव्हाणांच्या रुपात पर्याय आणि चांगला चेहरा मिळू शकतो.
३. आदर्श प्रकरण- आदर्श प्रकरणात अशोक चव्हाणांवर आरोप झाले. तेव्हा भाजप विरोधात होता. आता परिस्थिती उलट आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा पाठी लागल्यानं काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आदर्श प्रकरणाची सध्या चर्चा नाही. पण चव्हाण अधिक सक्रिय झाल्यास हे प्रकरण चर्चेत येऊ शकतं. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येत असताना चव्हाणांच्या आदर्श प्रकरणाची चर्चा सुरू झाली होती. भाजपमध्ये गेल्यास यंत्रणांचा ससेमिरा थांबतो असा अनेक नेत्यांचा अनुभव आहे.
४. मराठवाड्यात भाजपला चेहरा- मुख्यमंत्रिपद भूषवलेल्या चव्हाण यांचा राजकीय अनुभव मोठा आहे. त्याचा फायदा भाजपला मराठवाड्यात होऊ शकतो. मराठवाड्यात पंकजा मुंडेंचा चेहरा भाजपकडे आहे. पण गेल्या निवडणुकीत त्या पराभूत झाल्या होत्या. चव्हाणांनी हाती कमळ घेतल्यास भाजपला मराठवाड्यात मोठा फायदा होईल.
५. काँग्रेसमधील सुंदोपसुंदी- पक्षांतर्गत सुंदोपसुंदीमुळे अशोक चव्हाण नाराज असल्याच्या चर्चा होत्या. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद नाना पटोले यांच्याकडे आहे. त्यांच्या नेतृत्त्वात काम करताना चव्हाण यांना अडचणी येत होत्या. भाजपमधून आलेल्या नाना पटोलेंच्या नेतृत्त्वात त्यांची घुसमट सुरू होती. पक्ष सत्तेत येण्याची शक्यता दिसत नसल्यानं आणि विरोधात बसून राजकारण करणं अवघड असल्यानं चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करू शकतात.