• Fri. Mar 13th, 2026

    दिलासा देणारी बातमी! राज्यात मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनियाचे रुग्ण घटले; काय सांगते आकडेवारी?

    दिलासा देणारी बातमी! राज्यात मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनियाचे रुग्ण घटले; काय सांगते आकडेवारी?

    मुंबई : राज्यामध्ये मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया यांसारख्या डासांमुळे फैलावणाऱ्या आजारांची रुग्णसंख्या सातत्याने कमी झाल्याचे दिसत आहे. या महिन्यामध्ये या आजाराच्या रुग्णांच्या संख्येमध्ये सर्वाधिक घट दिसून आली आहे. मलेरिया, डेंग्यू तसेच डासांमुळे फैलावणारे जन्य आजार कमी करण्यासाठी सातत्याने केले जाणारे प्रयत्न तसेच विविध महापालिकांच्या क्षेत्रांमध्ये करण्यात येत असलेले प्रयत्न यांनाही यश येत असल्याचे यातून दिसत आहे.

    सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मलेरियाच्या प्लास्मोडियम विविएक्स या प्रकाराच्या दोन हजार ६४९ रुग्णांची ऑगस्ट महिन्यात नोंद झाली होती. सप्टेंबरमध्ये ही संख्या दोन हजार नऊ, ऑक्टोबरमध्ये एक हजार ८१०, डिसेंबरमध्ये एक हजार ७६८, तर जानेवारी महिन्यात ४३७ रुग्णसंख्या नोंदण्यात आली. संमिश्र प्रकारच्या मलेरियाचे ऑगस्ट महिन्यात एक हजार २४१ रुग्ण आढळून आले होते, डिसेंबरमध्ये ही संख्या ७९५ होती, तर जानेवारीमध्ये १४७ रुग्णांची नोंद झाली.

    डेंग्यू रुग्णांच्या संख्येमध्येही वेगाने घट झालेली दिसत आहे. ऑगस्ट महिन्यात ही संख्या दोन हजार ७०१ होती. डिसेंबरमध्ये ती एक हजार ४९८ होती, तर यावर्षी जानेवारी महिन्यात ती ४२६पर्यंत खाली आली. चिकनगुनियाची रुग्णसंख्या ऑगस्ट महिन्यात कमी, म्हणजे १३४ इतकी होती. त्यात वाढ होऊन ती नोव्हेंबर महिन्यात ३६० वर गेली. तर यावर्षी जानेवारीमध्ये चिकनगुनियाच्या ७७ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

    महिना मलेरिया संमिश्र डेंग्यू चिकनगुनिया

    ऑगस्ट २,६४९ १,२४१ २,७०१ १३४
    सप्टेंबर २,००९ ५५९ ४,७३७ २९३
    ऑक्टोबर १,८१० ४२४ ३,६४९ ३०८
    नोव्हेंबर १,५६६ ३६० ३,२८० ३६०
    डिसेंबर १,७६८ ७९५ १,४९८ २४१
    जानेवारी२४ ४३७ १४७ ४२६ ७७
    (स्रोत – सार्वजनिक आरोग्य विभाग )

    जनजागृती, प्रतिबंधक मोहिमांना यश

    काही वर्षांपूर्वी मलेरियाची रुग्णसंख्या वाढती होती. त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाणही वाढते होते. मात्र मागील दोन वर्षांपासून मलेरियाच्या रुग्णसंख्येमध्ये घट झाली आहे. गतवर्षी ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत यंदा जानेवारी महिन्यामध्ये मलेरिया रुग्णांमध्ये घट नोंदवण्यात आली आहे. डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येमध्येही घट दिसून येत आहे. डासांचा नायनाट करण्यासाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय साथनियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत विविध जनजागृती मोहिमा आणि कार्यक्रम राबवण्यात येतात. जनजागृतीसह डासांचा नायनाट करण्यासाठी प्रभावी औषधांची फवारणी केली जाते. पाणी साठवून न ठेवणे, आजाराचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्वरित वैद्यकीय चाचणी करून घेणे, घरामध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढवणाऱ्या झाडांची लागवड न करणे आदी प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या जातात. या कार्यक्रमामध्ये डासांच्या प्रादुर्भावास प्रतिबंध करणाऱ्या अनेक नव्या गोष्टींची भर घालण्यात आली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed