• Wed. Mar 11th, 2026
    आता अंत्यविधींसाठी लाकडांऐवजी ‘गोकाष्ठ’, पुण्यात वैकुंठ स्मशानभूमीत वापर सुरु

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : अंत्यसंस्कारांसाठी पारंपरिक लाकडावरील दहनाऐवजी गाईच्या शेणापासून तयार केलेल्या गोकाष्ठाचा वापर महापालिकेने वैकुंठ स्मशानभूमीत प्रायोगिक तत्त्वावर सुरू केला आहे. त्यामुळे वृक्षतोड कमी होऊन वायू प्रदूषणही कमी होण्यास मदत होईल, असा दावा करण्यात आला आहे.

    दहनपद्धतीने होणाऱ्या अंत्यसंस्कारांसाठी गाईच्या शेणापासून तयार केलेल्या गोकाष्ठचा वापर करावा, असा प्रस्ताव जय जिनेंद्र या स्वयंसेवी संस्थेने महापालिकेला दिला होता. यानंतर महापालिकेने नागपूर येथील ‘निरी’ या शासकीय संस्थेमार्फत या प्रस्तावाची पडताळणी केली. त्याचा अहवाल सकारात्मक आल्याने अतिरिक्त आयुक्तांच्या मान्यतेने वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कारांसाठी गोकाष्ठ वापरण्यास प्रायोगिक तत्त्वावर परवानगी देण्यात आली आहे.

    वैकुंठ स्मशानभूमीत दररोज ३५ ते ४० पार्थिवांवर अंत्यसंस्कार होतात. पारंपरिक लाकडावरील दहन पद्धतीच्या अंत्यसंस्कारांसाठी दररोज ३०० ते ३५० किलो लाकडाचा वापर होतो. या अंत्यसंस्कारांमुळे परिसरात प्रदूषण होत असल्याची तक्रार स्थानिक रहिवाशांकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आता गोकाष्ठाचा प्रयोग केला जाणार आहे.

    प्रायोगिक तत्त्वावर वापर सुरू

    नागरिकांच्या मागणीनुसारच वैकुंठासह अन्य स्मशानभूमींमध्ये प्रायोगिक तत्त्वावर गोकाष्ठचा वापर सुरू केला आहे. एका अंत्यसंस्कारासाठी अंदाजे पाच हजार रुपये खर्च अपेक्षित असून, हा खर्च नातेवाइकांकडून घेण्यात येईल. त्यामध्ये फुले, हार, तूप, कापूर व गोकाष्ठचा समावेश असेल, असे पालिकेच्या परिपत्रकात नमूद आहे.

    गोकाष्ठमध्ये काय?

    गाईच्या शेणापासून तयार केलेल्या गोकाष्ठमध्ये गुलाब, चंदन, कापूर, तुपाचा वापर केला गेला आहे. त्यामुळे विजेची बचत होते, धूर कमी होतो. कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण अवघ्या दहा टक्क्यांवर येते. वातावरण शुद्ध होऊन ऑक्‍सिजन निर्मिती होते. ‘अंत्यसंस्कारानंतर राखेचे प्रमाण कमी राहते. ही राख व शेणाद्वारे कुंड्या तयार करून पुणे परिसरात एक कोटी वृक्षारोपणाचा आमचा प्रयत्न आहे,’ असे जय जिनेंद्र फाउंडेशनचे राजकुमार छाजेड यांनी सांगितले. होळी, शेकोटी व अन्य दहनांमध्येही गोकाष्ठचा वापर करता येतो, असेही त्यांनी सांगितले.
    गृहिणींचे बजेट कोलमडलं! लसणाची फोडणी महागली, एक किलोसाठी मोजावे लागतायेत इतके रुपये
    गोकाष्ठचा वापर करून पर्यावरणपूरक पद्धतीने अंत्यसंस्कार करणे शक्य होते. नागरिकांच्या मागणीनुसार सुविधा देण्याच्या सूचना संबंधित संस्थेला दिल्या आहेत. नागरिकांकडून तक्रार आल्यास संस्थेचे काम थांबविण्यात येईल.- श्रीनिवास कंदुल, प्रमुख, विद्युत विभाग, महापालिका

    महत्त्वाचे…

    गाईच्या शेणापासून तयार करण्यात येते गोकाष्ठ
    एका अंत्यसंस्कारासाठी अंदाजे पाच हजार रुपये खर्च
    गोकाष्ठमध्ये गुलाब, चंदन, कापूर, तुपाचा वापर
    कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण अवघ्या दहा टक्क्यांवर
    वातावरण शुद्ध होऊन ऑक्‍सिजन निर्मिती
    अंत्यसंस्कारानंतर राखेचे प्रमाण कमी राहते

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed