आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे संघटनेच्या वाढीसाठी आता राज ठाकरे यांनी लक्ष घातलं आहे. त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात मनसेतील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. मागील काळात राज ठाकरेंचा कोकण दौरा झाल्यानंतर याठिकाणची जिल्हा कार्यकारणी बरखास्त करण्याचा निर्णय राज ठाकरे यांनी घेतला होता. तेव्हापासून पक्षाचे सरचिटणीस परशुराम उपरकर हे नाराज होते. अखेर आज मनसे कार्यालयाने पत्रक काढून परशुराम उपरकर आणि प्रविण मर्गज यांचा पक्षाशी कुठलाही संबंध नाही असं थेट जाहीर केलं आहे.
राज ठाकरे यांनी आपल्या कोकण दौऱ्यात अनेक पदाधिकाऱ्यांचे कान टोचत नवीन काम करणाऱ्यांना संधी देणार असल्याचेही जाहीर केलं होतं. नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात येईल असेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानंतर आता या दोन पदाधिकाऱ्यांचा मनसेशी कोणताही संबंध नसल्याचं थेट पत्रक काढून त्यांची हकालपट्टी करण्यात आल्याचं या पत्रातून सांगण्यात आलंय.
परशुराम उपरकर यांची हकालपट्टी का?
राज ठाकरेंच्या दौऱ्यानंतर कोकणासाठी मनसे संपर्क नेत्यांची घोषणा करण्यात आली. यामध्ये परशुराम उपरकर यांना स्थान देण्यात आलं नव्हतं. या संपर्क नेत्यांनी जिल्ह्यातील कार्यकारणीची निवड केली. परंतु त्यात ज्यांना बरखास्त केले होते अशांनाही संधी देण्यात आली. काहींनी मर्जीतले पदाधिकारी नेमले असं सांगत परशुराम उपरकर नाराज होते. यामुळे आपण कार्यकर्त्यांच्या वरून पुढची राजकीय दिशा ठरवू असेही परशुराम उपरकर यांनी म्हटलं होतं.
नारायण राणे यांनी शिवसेना सोडली तेव्हा कोकणात परशुराम उपरकर हे शिवसेनेशी एकनिष्ठ राहिले. राणेंच्या वर्चस्वातही कोकणात शिवसेना रुजवण्याचं काम करणाऱ्या उपरकरांना बाळासाहेब ठाकरेंनी विधान परिषदेची आमदारकी दिली होती. परशुराम उपरकर यांचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठा संपर्क आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून काढण्यात आलेल्या या जाहीर पत्रानंतर परशुराम उपरकर कोणती भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.