संजय राऊत काय म्हणाले?
“कायदा आणि घटनेचे मुडदे पाडून, पैशांचे ठोक व्यवहार करुन हे सरकार आणलंय. महाराष्ट्रात दुसरं काय होऊ शकतं? गेली दीड वर्ष आम्ही काही गोष्टी समोर आणतोय… भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेला गोळीबार हा उल्हासनगरमधला आहेच, पण मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील आहे आणि या गोळीबाराला स्वतः मुख्यमंत्री जबाबदार आहेत” असं संजय राऊत म्हणाले.
“मी गायकवाडांच्या कृत्याचं समर्थन करत नाही. पण ते सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत, त्यांच्या पक्षाचे गृहमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत… भाजप आमदार गणपत गायकवाड त्राग्याने म्हणत आहेत की मी मनस्तापातून एकनाथ शिंदे यांच्यामुळे हा गोळीबार केला… हे त्यांचं स्टेटमेंट आहे. या महाराष्ट्रात जर एकनाथ शिंदेंसारखे मुख्यमंत्री असतील, तर गुन्हेगारच पैदा होतील, असंही भाजप आमदार असलेल्या गायकवाड यांचं पोलीस स्टेशनमधलं निवेदन आहे” याकडे राऊत यांनी लक्ष वेधलं.
“गुंडांच्या टोळ्या जामिनावर सोडल्यात”
“मी वर्षभर सांगतोय, मुख्यमंत्री कार्यालयात तुरुंग, गुन्हेगारांच्या टोळ्या यांना कसे दूरध्वनी जात आहेत. निवडणुकांसाठी गुन्हेगारांची मदत व्हावी, यासाठी मुंबई, पुणे कोल्हापूरसह अनेक गुन्हेगारांना जामिनावर बाहेर काढण्यात आलं आहे, मी नावं देऊन सांगू शकतो. चार प्रमुख गुंडांच्या टोळ्यांना जामिनावर बाहेर काढण्यात आलं आहे, त्यात एका गुंडाचा खून झाला. मुंबईसह महाराष्ट्रात हे प्रकार सुरु आहेत. गुंड टोळ्यांच्या हातात कायदा दिलाय, तुम्ही सांगाल तो कायदा, आम्हाला निवडणुका जिंकून द्या, असं यांचं म्हणणं आहे.” असा धक्कादायक आरोपही संजय राऊत यांनी केला.
“फडणवीसांनी उत्तर द्यावं”
“महेश गायकवाड कोण आहे, माहिती नाही, पण त्यांच्यावर गोळीबार होणं धक्कादायक आहे. कुठे आहेत गृहमंत्री, आम्हाला कायदा शिकवतात, कोणालाही कायदा हातात घेऊ दिला जाणार नाही, हे काय फक्त शिवसेना, काँग्रेस आणि खरी राष्ट्रवादी यांच्याबाबत आहे का? एका आमदाराने गोळीबाराने आमदार करुनही मुख्यमंत्र्यांचं निवेदन नाही, गृहमंत्र्यांची भूमिका स्पष्ट नाही, अजित पवार म्हणतात मी गृहमंत्र्यांशी बोलेन.. नागपूर असेल, ठाणे जिल्हा असेल किंवा मुंबई-पुणे… राजकीय स्वार्थासाठी गुन्हेगार-माफियांना राजकीय विरोधकांवर सोडलं जात आहे. फडणवीस आणि त्यांची कुईकुई करणारी पिलावळ यांनी या प्रकरणावर बोलावं. फडणवीस आपण वकील आहात, ज्ञानी आहात, राम तुमच्या बाजूने आहे, रामावर तुम्ही हक्क सांगताय, पण रामाचं राज्य कायद्याचं होतं, तुमचं राज्य कायद्याचं आहे का?” असा सवालही संजय राऊत यांनी केला.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News