• Sat. Sep 21st, 2024

महाराष्ट्र-तेलंगण व्यवहार ठप्प; मेडीगड्डाचा पूल खचल्याने सीमेवरील गेटला कुलूप

महाराष्ट्र-तेलंगण व्यवहार ठप्प; मेडीगड्डाचा पूल खचल्याने सीमेवरील गेटला कुलूप

महेश तिवारी, गडचिरोली : महाराष्ट्र-तेलंगण सीमेवरून वाहणाऱ्या गोदावरी नदीवर बांधलेल्या मेडीगड्डा-कालेश्वर प्रकल्पाच्या पुलाला तडे गेले. सुरक्षेच्या कारणास्तव हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. गेटला कुलूप लावण्यात आल्याने दोन्ही राज्यातील सीमावर्ती भागातील आदिवासींचे व्यवहार ठप्प पडले आहेत. सिरोंचा तालुक्यातील सुमारे १५हून अधिक गावकऱ्यांना याचा फटका बसत आहे. किमान पायी प्रवासासाठी पूल सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.

सिरोंचा तालुक्यातील पोचमपल्ली गावाजवळ तेलंगण सरकारने मेडीगड्डा-कालेश्वर हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी तेलंगणच्या सिंचन सुविधेसाठी हा प्रकल्प उभारला. सिरोंचा तालुक्यातील नागरिकांनी या प्रकल्पाला सुरुवातीपासून विरोध केला. तीन वर्षांतच हा प्रकल्प पूर्ण करण्याच्या घाईत बांधकाम निकृष्ट झाल्याचा आरोप होत आहे. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात प्रकल्पाच्या काही पिलरला तडे गेले. दरवाजालाही भेगा पडल्या. प्रकल्पावर उभारण्यात आलेला दोन राज्यांना जोडणारा एक किलोमीटर लांबीचा पूल दळणवळणासाठी सोयीचा होता. हा पूलदेखील खचला. यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. महाराष्ट्र सीमेवरील गेटला कुलूप लावण्यात आले आहे. यापूर्वी असलेले तेलंगण पोलिस जाऊन खासगी सुरक्षा रक्षक नेमण्यात आले आहेत. एकूणच या पुलाच्या बांधकामावरून तेलंगणमधील राजकीय वातावरण तापले. तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी चौकशीचे आदेश दिले. तीन दिवस कनेपल्ली, महादेवपूर, मेडीगड्डा येथील कार्यालयांवर छापे टाकून कागदपत्रे जप्त करण्यात आली. प्रकल्पावर आजवर प्रतिक्रिया देण्यासाठी सज्ज असलेले नेते शांत झाले आहेत.

चौकशीचा रोख…

– या प्रकल्पाच्या माध्यमातून नेमका कुणाला आर्थिक फायदा झाला?

– प्रकल्पाच्या बांधकामात कशा पद्धतीने अनियमितता झाली?

– काही नियमांची पायमल्ली करण्यात आली आहे काय?
जगन्नाथ मंदिराचा कायापालट, भाविकांच्या सुविधेसाठी ओडीशा सरकारने साकारला ‘श्री मंदिर परिक्रमा प्रकल्प’
पर्यटकांची गर्दी ओसरली

तेलंगणच्या दक्षता विभागाने टाकलेल्या धाडीनंतर नेहमी गजबजलेला मेडीगड्डा आणि कनेपल्ली येथील पम्पहाउसवर शुकशुकाट पसरला आहे. यापूर्वी प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असत. आता हा परिसर निर्मनुष्य झाला आहे.

गडचिरोलीपेक्षा तेंलगण सोयीचा

पूल बंद झाल्याचा सर्वाधिक फटका सिरोंचा तालुक्यातील आसरल्ली, अंकिसा, नदीगुडा, पोचमपल्ली, वडदम, पेंटिपाका, तुमनूरसह परिसरातील गावांतील जनतेला बसत आहे. मुळात या भागातील जनतेला खरेदी-विक्रीसाठी तेलंगणमध्ये जावे लागते. आरोग्याच्या सोयीसाठी गडचिरोलीपेक्षा तेलंगण अधिक सोयीचा वाटतो. हा बंद पूल बंद झाल्याने अधिकचा फेरा कापूस जावे लागत आहे. आर्थिक भुर्दंडही बसत आहे. यातूनच नागरिक पायी प्रवासासाठी पूल सुरू करण्याची मागणी करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed