• Sat. Sep 21st, 2024
सत्यशोधक दीनमित्रकार मुकुंदराव पाटील पुरस्कारांचं वितरण

अहमदनगर : सत्यशोधक दीनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समितीच्या वतीने देण्यात येणारे या वर्षीचे दीनमित्रकार मुकुंदराव पाटील राज्यस्तरीय पत्रकारिता व साहित्य पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. ‘लोकमत’च्या कार्यकारी संपादक अपर्णा वेलणकर यांना सन २०२२-२३ या वर्षासाठीचा ‘सत्यशोधक मुकुंदराव पाटील पत्रकारिता’ पुरस्कार, तर वसंत गायकवाड (कोल्हापूर), ललित अधाने (छत्रपती संभाजीनगर), प्रा. डॉ. प्रशांत गायकवाड (कोल्हापूर), डॉ. हसंराज जाधव (पैठण), राहुल हांडे (नाशिक), प्रा. सत्यजित पाटील (संगमनेर), सुनील गोसावी (अहमदनगर), प्रा, डॉ. राजेंद्र गवळी (नेवासा) यांना दीनमित्रकार साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आले.

अहमदनगर जिल्ह्यात तरवडी येथून मुकुंदराव पाटील यांनी ‘दीनमित्र’ हे सत्यशोधक नियतकालिक ५८ वर्षे चालविले. त्यांच्या १३८ व्या जयंतीनिमित्त यावर्षीचे पत्रकारिता व साहित्य पुरस्कार राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. स्मारक समितीचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, उपाध्यक्ष कॉ. बाबा आरगडे, सचिव उत्तमराव पाटील, साहेबराव घाडगे, ॲड. देसाई देशमुख यांची मंचावर उपस्थिती होती.

राजेंद्र दर्डा म्हणाले, सत्यशोधकी विचार हा माणसे जोडतो व भेदाभेद संपवितो. हा विज्ञानवादी विचार आहे. महात्मा फुले यांच्यानंतर मुकुंदराव पाटील यांनी ‘दीनमित्र’ नियतकालिकातून हा विचार पेरला. मुकुंदराव हे पत्रकारितेतून तिखट टीका करायचे व व्यवस्थेला पर्यायही सूचवायचे. कुलकर्णी वतन रद्द करुन तलाठी पद निर्माण करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. आजच्या पत्रकारांनी हा सत्यशोधकी विचार समजून घेण्याची गरज आहे.

पत्रकारिता पुरस्कार प्राप्त ‘लोकमत’च्या कार्यकारी संपादक अपर्णा वेलणकर म्हणाल्या, ‘सत्यशोधक’ या शब्दाचा अर्थ व या शब्दाचे वजन लोक आज विसरताहेत. पत्रकारिता क्षेत्रातील लोकांना हा शब्द ऐकूण भोवळ येईल असा आजचा काळ आहे. विचित्र हतबल परिस्थितीत आपण जगतो आहोत. अशावेळी पत्रकारांनी खुर्चीवरुन उठून, वाहनातून उतरुन, गुगल सोडून रस्त्यावर उतरण्याची व सामान्य माणसांत जाण्याची गरज आहे. तेथेच आपणाला महात्मा फुले, मुकुंदराव भेटतील. ‘लोकमत’ दीपोत्सवमधून आम्ही हेच सामान्य माणसांचे जगणे समोर आणतो. नरेंद्र घुले पाटील यांनी ‘दीनमित्र’ व ‘लोकमत’च्या पत्रकारितेबद्दल गौरवोद्गार काढले.

साहित्य पुरस्कार प्रदान

‘लोकमत’च्या कार्यकारी संपादक अपर्णा वेलणकर यांना सन २०२२-२३ या वर्षासाठीचा ‘सत्यशोधक मुकुंदराव पाटील पत्रकारिता’ पुरस्कार, तर वसंत गायकवाड (कोल्हापूर), ललित अधाने (छत्रपती संभाजीनगर), प्रा. डॉ. प्रशांत गायकवाड (कोल्हापूर), डॉ. हसंराज जाधव (पैठण), राहुल हांडे (नाशिक), प्रा. सत्यजित पाटील (संगमनेर), सुनील गोसावी (अहमदनगर), प्रा, डॉ. राजेंद्र गवळी (नेवासा) यांना दीनमित्रकार साहित्य पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed