• Sat. Sep 21st, 2024

पुणेकरांवरील पाणीकपातीची संभाव्य टांगती तलवार अजित पवार यांनी दूर केली; म्हणाले, फेब्रुवारीत…

पुणेकरांवरील पाणीकपातीची संभाव्य टांगती तलवार अजित पवार यांनी दूर केली; म्हणाले, फेब्रुवारीत…

म. टा. प्रतिनिधी, पुणे

यंदा धरणातील पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे. पुण्यातच नाही तर संपूर्ण राज्यात सगळीकडे अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे सध्या तरी पुणेकरांना पाण्याबाबत चिंता करायला लावू नका, असे सांगत फेब्रुवारीत कालवा सल्लागार समितीची बैठक घेऊ, असे सांगत नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पुणेकरांवरील पाणीकपातीची संभाव्य टांगती तलवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दूर केली.

पुण्यात सर्किट हाऊस येथे अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी पुण्याच्या पाण्याची स्थितीबाबत विचारले असता त्यावर पवार त्यांनी सध्या पाण्याविषयी चिंता करण्याची गरज नाही, हे स्पष्ट केले.

पुणेकरांना पाण्याची सध्या चिंता नको

‘मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्येच संपूर्ण राज्यातील पाण्याची स्थितीची कल्पना दिली गेली आहे. या बैठकीतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा मंत्री म्हणून पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानंतर शेतीला पाणी द्या, असेही सांगितले आहे. पुढील वर्षी जुलैपर्यंत पाणी राखीव ठेवण्याबाबत सूचना दिल्या असून त्याबाबत जलसंपदा विभाग नियोजन करीत आहे. पुण्याच्या पाण्याची परिस्थिती सुद्धा बिकट आहे. त्यामुळे मार्चमध्ये कालवा सल्लागार समितीची बैठक घेऊन एप्रिल ते जून या चार महिन्याचे नियोजन कसे करता येईल, याचा आढावा घेतला जाईल’, अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली.

अडीच हजार कोटींची मागणी

अवकाळी पाऊस, गारपीट सारखे नैसर्गिक संकट आले. त्यातून सोयाबीन, फळबागांचे नुकसान झाले. त्यावेळी पंचनामे करण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या. त्यावेळी काही ठिकाणी पालकमंत्री पाहणी दौऱ्यावर गेले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे ही स्थिती मांडल्यावर त्यांनी केंद्रीय पथक पाठवून सर्वेक्षण केले. त्याचा अहवाल केद्राकडे जाईल. सुमारे ४० तालुके दुष्काळी ठरविले असून त्यासाठी अडीच हजार कोटी रुपये मागितले आहेत, असेही अजित पवार यांनी नमूद केले.

सर्व्हेला काही आधार नसतो

एका सर्वेक्षणात महाविकास आघाडीला अधिक जागा मिळत असल्याचे दिसून आले आहे. याबाबत अजित पवार यांना विचारता ते म्हणाले, विधानसभेच्या पाच राज्यांच्या निवडणुकांचे कल, त्यांचे निकाल आपण पाहिले आहे. काही जण २५ हजार, काही जण ५० हजार मतदारांचे सर्वेक्षण करतात, ते कोणत्या भागांत झाले, यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. आम्ही तीन पक्षांनी युती केली आहे. आम्ही त्याची काळजी घेऊ. आमच्या हातात आणखी काही महिने आहेत. त्यामुळे महायुतीच्या बाजूने वातावरण कसे वळविता येईल याबाबत आम्ही काम करू. तुम्ही किंवा मी पण ज्योतिषी नाही, अशी टिपण्णी त्यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed