• Sun. Jun 7th, 2026

    वर्षभरापूर्वी जुना रेल्वे उड्डाणपूल जमीनदोस्त, नवीन उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू होईना,वाहतुकीचा खोळंबा

    वर्षभरापूर्वी जुना रेल्वे उड्डाणपूल जमीनदोस्त, नवीन उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू होईना,वाहतुकीचा खोळंबा

    खेमेंद्र कटरे, गोंदिया: शहरातील जुना रेल्वे उड्डाणपूल वर्षभरापूर्वीच जमीनदोस्त करण्यात आला. नवीन उड्डाणपुलाच्या बांधकामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली. तरी शासन व प्रशासनाच्या दफ्तर दिरंगाईमुळे रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम शासकीय कार्यालयात अडकून आहे. त्यामुळे गोंदियातील रहिवासी एकाच उड्डाणपुलावरून धोकादायक प्रवास करीत आहे. पुलाअभावी वाहतुकीचीही समस्या निर्माण झाली आहे.

    गोंदिया आणि बालाघाट या जिल्हा मुख्यालयाला जोडणारा रेल्वे पूल ब्रिटिशांच्या काळात बांधण्यात आला होता. तो जीर्ण व मुदत बाह्य झाला होता. असे असतानाही या पुलावरून वाहतूक सुरू होती. सुरक्षेच्या दृष्टीने तत्कालीन जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी २ मे २०२२ रोजी या पुलावरून वाहतूक बंद करण्याचे आदेश दिले होते. सूचनेनुसार गतवर्षी जून-जुलैमध्ये पूल पाडण्यात आला. या वेळी पूल पाडल्यानंतर तातडीने नवीन पूल बांधला जाईल, अशी अपेक्षा जनता बाळगून होती. मात्र तसे होऊ शकले नाही. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत नवीन उड्डाणपुलाच्या बांधकामाची निविदा प्रकिया करण्यात आली. पुलासाठी शासनाने ४७ कोटी ६८ लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याचे सांगण्यात आले. या निधीतून ५५३ मीटर लांबीचा नवीन रेल्वे उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. मात्र निधी मंजूर होऊन वर्ष लोटले तरी बांधकामाला सुरवात झालेली नाही.

    आवक घटल्याने भाज्या कडाडल्या, टोमॅटो घसरला तर गवारने गाठली शंभरी, जाणून घ्या सध्याचे दर

    निविदा प्रक्रिया पूर्ण होताच सप्टेंबर महिन्यापासून नवीन उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती यापूर्वी देण्यात आली. काही राजकीय पुढाऱ्यांनी डिसेंबरमध्ये बांधकाम सुरू होणार असल्याचे कार्यक्रमामध्ये सांगितले. आता डिसेंबरही लोटत आहे. मात्र नवीन उड्डाणपुलाच्या बांधकामाला सुरवात झाली नाही. पुलाचे बांधकाम रखडले आहे.

    कार्यादेश मंजूर पण…

    उड्डाणपुलाच्या बांधकामाची निविदा प्रकिया पूर्ण झाली आहे. पहिल्या टप्प्यात १५ कोटींहून अधिक निधीतून बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलासाठी शासनाच्या संबंधित मंत्रालय स्तरावरून कार्यादेश मंजूर करण्यात आला आहे. शासनस्तरावरील प्रकिया पूर्ण होताच बांधकामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नरेश लभाणे यांनी सांगितले होते. मात्र घोडे कुठे अडले ते कुणास ठाऊक.

    दुसरा पूलही धोकादायक

    शहरातील दोन भागाला जोडणारा हा पूल महत्त्वाचा आहे. लगतच्या दुसऱ्या उड्डाणपुलावरून सध्या वाहतूक सुरू आहे. या पुलाच्या अरुंदपणामुळे वारंवार वाहतूक कोंडी होते. वाढत्या रहदारीमुळे या उड्डाणपुलावर अनेक अपघात झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी पुलावरील अपघातात दोन तरुणांना जीव गमवावा लागला आहे. हा पूल केवळ शहरवासीयांसाठीच नव्हे तर या उड्डाणपुलावरून प्रवास करणाऱ्यांसाठीही धोकादायक आहे.

    आम्ही दहशतवादी आहोत का? पोलिसांनी मोर्चा रोखला, तुपकर दाम्पत्याचा संताप

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed