• Sat. Sep 21st, 2024
Mumbai Local: मुंबईकरांचा लोकल प्रवास सुस्साट होणार, मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; जाणून घ्या…

म. टा. प्रतिनिधी, मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेलदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास नव्या वर्षात अधिक वेगवान होणार आहे. हार्बर मार्गासह ट्रान्सहार्बर आणि नेरुळ-खारकोपरदरम्यान रुळांची वेगक्षमता १०५ किलोमीटर प्रतितास करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. यामुळे हार्बर मार्गावरील प्रवासात १५ मिनिटांची बचत शक्य होणार आहे.

सध्या काय ?

सीएसएमटी ते पनवेलदरम्यान सध्या ताशी ८० किमी वेगाने लोकल धावतात. या वेगाने सीएसएमटी ते पनवेल अंतर पार करण्यासाठी ८० मिनिटे लागतात. हार्बर मार्गावरील प्रवाशांचा प्रवास वेळ वाचवण्यासाठी ताशी १०५ वेग निश्चित करण्यात आला आहे. या वेगामुळे सीएसएमटी ते पनवेल अंतर ६५-७० मिनिटांत पूर्ण करणे शक्य होणार आहे, असे वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

भारतीय संघाला मोठा धक्का, इशान किशनला बीसीसीआयने संघाबाहेर का केले जाणून घ्या कारण…
पहिल्या तिमाहीत लाभ

रेल्वेरुळांचे मजबूतीकरण, रुळांलगत असलेल्या झोपड्या हटवणे आणि ओव्हरहेड वायरमध्ये आवश्यकतेनुसार बदल या गोष्टी वेग वाढवण्यासाठी करण्यात येणार आहेत. नव्या वर्षाच्या पहिल्या तिमाहीपर्यंत कामे पूर्ण करून वेग वाढवण्याचे नियोजन आहे. कामे पूर्ण झाल्यावर नव्या वेगाने चाचणी घेण्यात येईल. त्यानंतर प्रवासी वाहतुकीसाठी नवा वेग लागू करण्यात येणार आहे. सीएसएमटी-पनवेलसह सीएसएमटी-बेलापूर दरम्यानच्या प्रवासवेळेतही काही मिनिटांची बचत अपेक्षित आहे.

ठाणे-वाशीही सुसाट

ट्रान्सहार्बरवरील ठाणे-वाशी, नेरुळ-खारकोपर आणि कर्जत ते खोपोलीदरम्यानच्या मार्गांवर वेग वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे हार्बरसह ट्रान्सहार्बर प्रवाशांच्या वेळेतही अंशतः घट अपेक्षित आहे.

वाढीव फेऱ्यांबाबत निर्णय नाही

मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर सीएसएमटी ते पनवेलदरम्यान १८८ आणि सीएसएमटी ते बेलापूरदरम्यान ७९ लोकल फेऱ्या धावतात. गाड्यांचा वेग वाढल्यास अतिरिक्त लोकल फेऱ्या चालवणे शक्य आहे का, याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही.

उशिरा घेतलेला निर्णय

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर लोकल फेऱ्या ताशी शंभरपेक्षा जास्त वेगाने धावत्या आहेत. हार्बर मार्गावर केवळ ताशी ८०च्या वेगाने लोकल धावतात. हार्बर मार्गावरील अतिरिक्त जलद लोकल सुरू करावी आणि गाड्यांचा वेग वाढवावा, अशी मागणी प्रवाशांकडून सातत्याने केली जात आहे. अखेर उशिरा का होईना वेग वाढवण्याच्या हालचाली मध्य रेल्वे प्रशासनाने सुरू केल्या आहेत. प्रशासनाने तातडीने अंमलबजावणी करून प्रवाशांसाठी वेगवान लोकल उपलब्ध करून द्याव्यात, अशी प्रतिक्रिया हार्बर मार्गावरील नियमित प्रवासी योगेश ढगे यांनी व्यक्त केली.

… म्हणून सीएसएमटी-टिळकनगर नाही

टिळकनगर ते पनवेलदरम्यान लोकल वेग वाढवण्यात येणार आहे. सीएसएमटी ते टिळकनगर दरम्यान दोन स्थानकांमधील अंतर कमी आहे. यामुळे कमाल वेग गाठणे लोकलला शक्य होत नाही. टिळकनगर ते गोवंडी दरम्यान रुळांलगत दाटीवाटीने झोपडपट्टी आहे. परिणामी रेल्वेरूळ ओलांडणाऱ्यांचे प्रमाण या विभागात अधिक आहे. सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेसाठी सीएसएमटी ते टिळकनगर दरम्यान वेगमर्यादा जैसे थे ठेवण्यात आली आहे.

खासदारांची साखर घ्यायला गेलेल्या ग्रामस्थांना कटू अनुभव, सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed