• Thu. Jun 11th, 2026
    महाराष्ट्रात मान्सूनची प्रगती सुरू, पण मुंबई-पुण्यात आणखी काही दिवस प्रतीक्षा; कोण-कोणत्या भागांत पावसाचा अंदाज?

    म.टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई/नागपूर: समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांना आर्द्रतेचा पुरवठा झाल्यास महाराष्ट्रामध्ये पुढील चार ते पाच दिवसांमध्ये मान्सून पुढे सरकू शकतो. मात्र आर्द्रतेचा हा पुरवठा सध्या तरी होत नसून मुंबईत मान्सून आगमनासाठी अजूनही प्रतीक्षा कायम आहे. आर्द्रतेचा पुरवठा झाला तर पुढील चार ते पाच दिवसांमध्ये रायगड ओलांडून मुंबईपर्यंत पाऊस पोहोचू शकेल. मात्र, सध्या तरी १३ जूनपर्यंत मुंबईमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता कमी आहे, असा अंदाज वर्तवला जात आहे.

    मुंबई, ठाणे, पालघर, रायगड येथे मंगळवारी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. मुंबईत दिवसभर ढगाळ वातावरण होते. परंतु पावसाचा पत्ता नव्हता. सायंकाळी तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. बुधवारपासून मुंबई, ठाणे या दोन्ही केंद्रांवर हलक्या पावसाचा अंदाज आहे. १३ जूनपर्यंत तरी मुंबईत हलकाच पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात एखाद्या प्रणालीमुळे आर्द्रतेचा पुरवठा झाल्यास पावसाचा वेग थोडा वाढू शकेल. मात्र १३ तारखेपर्यंत मुंबईमध्ये प्रत्यक्ष मान्सून दाखल होण्याची शक्यता नसल्याची माहिती प्रादेशिक हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. कदाचित रायगड जिल्ह्यात आणि मुंबईत एकाच वेळी पाऊस दाखल होऊ शकतो. मात्र, याचाही अंदाज आत्ताच्या परिस्थितीत वर्तवता येणार नाही, असेही अधिकारी सांगत आहेत.

    पावसाचा शिडकावा

    पावसाच्या आगमनाकडे सगळेच डोळे लावून बसले आहेत. मात्र तळकोकणात दाखल झालेला पाऊस मुंबईकरांना हुलकावणी देत आहे. अखेर मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास मुंबईत तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. पावसाने मुंबई शहरामध्ये उपस्थिती लावली. दादरला पाच-सात मिनिटे, लोअर परळ, प्रभादेवी येथेही पाच-सात मिनिटे शिडकावा होऊन पाऊस थांबला. इतर वेळी कार्यालयातून घरी जाताना पाऊस आला की, मुंबईकरांची चिडचिड होते, मात्र सध्या उकाड्याने त्रस्त झालेल्या मुंबईकरांना शिडकाव्याने दिलासा दिला.

    मान्सूनच्या अफवा; शुक्रवारपासून पाऊस

    सध्या विदर्भात वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून दिवसभर ऊन तापल्यावर संध्याकाळी ढगाळ वातावरण तयार करून पावसाच्या हलक्या सरींची हजेरी लागत आहे. १२ जूनपासून विदर्भातील नागपूर, वर्धा, वाशीम, चंद्रपूर व यवतमाळ या जिल्ह्यांना वादळी पावसाचा ‘यलो’ तर इतर जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. या काळात मान्सून विदर्भात किंवा विदर्भाच्या दारात पोहोचण्याची शक्यता आहे.

    मान्सून विदर्भात दाखल झाल्याचे मेसेज मंगळवारी सोशल मीडियावर व्हायरल झाले. मात्र, नैऋत्य मान्सूनने मंगळवारी देशातील काही भागांत आगेकूच केली असली तरीसुद्धा अद्याप विदर्भात मान्सून दाखल होण्यास अवकाश असल्याचे प्रादेशिक हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

    भारतीय हवामान विभागानुसार, पुढील चार ते पाच दिवसांत मान्सूनच्या प्रगतीसाठी वातावरण अनुकूल असून महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांत तो आणखी पुढे सरकण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रातील आणखी काही भाग, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडूचे उर्वरित क्षेत्र, छत्तीसगड, ओडिशा. झारखंड आणि बिहारच्या काही भागांत मान्सून पोहोचू शकतो. मात्र, विदर्भात अद्याप मान्सून दाखल झालेला नाही. त्यामुळे राज्यातील नागरिकांचे लक्ष आता मान्सूनच्या आगमनाकडे लागले आहे.

    Maharashtra Rain Alert: 10 जूनपासून अख्खा महाराष्ट्र भिजणार, 30 जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह कोसळणार, IMDचा नवा अलर्ट, पेरणीबाबत शेतकऱ्यांना महत्त्वाचा सल्ला

    पुण्यात मान्सूनची प्रतीक्षा

    अनुकूल वातावरणामुळे मान्सूनने मंगळवारीदेखील राज्याच्या काही भागात आगेकूच केली. दक्षिण महाराष्ट्रातील सोलापूरच्या पुढे आणि लगतच्या भागात तो पोहोचला. पुढील दोन दिवस मान्सूनच्या प्रगतीला अनुकूल वातावरण असल्याचे संकेत भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिले आहेत. पुण्यात मान्सून दाखल होण्यास अजून काही दिवसांचा कालावधी लागणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

    खानदेशातील हवामान कसं असेल?

    बुधवारी, दि. 10 जून रोजी, खानदेशातील हवामान प्रामुख्याने कोरडं आणि उष्ण राहणार आहे. तापमानाचा पारा चढला असून दिवसभर 40 ते 42 अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याचा अंदाज आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांमध्ये दुपारच्या वेळी कडक ऊन आणि उष्ण वारे वाहतील.

    Maharashtra TimesWeather Update: जूनच्या प्रारंभी मुंबईत पावसाची मोठी तूट, रत्नागिरीत मान्सून दाखल, उर्वरित महाराष्ट्रात मोसमी पावसाची प्रतीक्षा

    मराठवाड्यात पावसाचा अंदाज

    मराठवाड्यात बुधवारी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान 35 ते 40 अंश सेल्सिअसदरम्यान राहणार आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार 15 जूननंतर मान्सून मराठवाड्यात पूर्णपणे सक्रीय होण्याची शक्यता आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed