परळ टीटी उड्डाणपुलाच्या संपूर्ण दुरूस्तीचे काम बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पूल विभागामार्फत नियोजित आहे. तथापि, मुंबईतील नागरिकांना तसेच वाहनचालकांना रस्ते प्रवास सुखकर व्हावा यासाठी सर्वात आधी या उड्डाणपुलाच्या रस्त्याचे पुनर्पृष्ठिकरण तातडीने हाती घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दौऱ्यात प्रत्यक्ष पाहणीवेळी महानगरपालिका प्रशासनाला दिले होते. त्यानुसार, या पुलावरील रस्त्याच्या दुतर्फा डांबराचा थर बदलण्याचे काम मागील आठवड्यात हाती घेण्यात आले.
वाहतुकीला अडथळा होऊ नये म्हणून सदर कार्यवाही रात्रीच्या वेळेत करण्याचे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांनी पूल विभागाला दिले होते आणि डागडुजीचे काम देखील हाती घेण्याच्या दृष्टीने सूचना केल्या होत्या. त्यानुसार दररोज रात्री ९.३० ते सकाळी ७ या कालावधीत रस्त्याच्या डागडुजीचे काम सुरू होते.
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी वेळोवेळी आढावा घेत परळ टीटी उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचा दैनंदिन पाठपुरावा केला.
पूल विभागाने दररोज अथक काम करून आठवड्यात ही दुरुस्ती पूर्ण केली आहे, रस्त्याचे डांबरीकरण व प्रसरण सांधे मुख्यत्वे करून भरण्यात आहेत, अशी माहिती उप आयुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले यांनी दिली.
प्रमुख अभियंता (पूल) विवेक कल्याणकर म्हणाले की, परळ टीटी उड्डाणपुलाच्या दुरूस्तीसाठी पूल विभागाने मुंबई वाहतूक पोलिसांकडे वाहतूक नियोजन करण्याच्या अनुषंगाने विनंती केली होती. त्यानुसार या कामाला गत आठवड्यात सुरूवात झाली. या अंतर्गत रस्त्याच्या दोन्ही बाजुला २५० मीटर अंतर टप्प्यात डांबर बदलण्यात आले आहे. काही ठिकाणी डांबराचा स्तर खराब झाल्याने वाहनचालकांनाही अडथळा येत होता. त्यामुळे रस्त्याचा पृष्ठभाग सपाटीकरण आणि प्रसरण सांध्यांच्या दुरूस्तीवर भर देण्यात आला. दुरुस्ती नंतर आता दादरच्या दिशेने तसेच दक्षिण मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे, अशी माहिती कल्याणकर यांनी दिली.
परळ टीटी उड्डाणपूल दुरुस्तीच्या पुढच्या टप्प्यात उर्वरित कामे केली जातील. शिवडी – न्हावाशेवा मुंबई ट्रान्सहार्बर रस्ता वाहनचालकांच्या सेवेत आल्यानंतर परळ टीटी पुलाच्या संपूर्ण कामाला सुरूवात करण्यात येईल, त्यामुळे वाहतूक सुरळीत राहील. परळ टीटी उड्डाणपूल संपूर्ण दुरूस्तीसाठीच्या वाहतूक पोलीस विभागाच्या सर्व परवानग्या घेण्यात आल्या होत्या. तसेच आगामी कालावधीत होणाऱ्या मुख्य कामांसाठी मुंबई वाहतूक पोलीस विभागामार्फत परवानगी मिळाली आहे. त्यामुळे मुख्य कामालाही येत्या काही दिवसात सुरूवात होईल.
Read Latest Maharashtra News And Marathi News