‘छगन भुजबळ तुमचा २४ तारखेनंतर हिशेब करतो…’ या जरांगे यांच्या वक्तव्याला उत्तर देताना, यापुढे दादागिरीला दादागिरीनेच उत्तर देणार असल्याचा इशारा भुजबळ यांनी दिला. जरांगे यांना गाढवाची उपमा देऊन भुजबळांनी टीकास्र डागले.
छगन भुजबळ म्हणाले, की ‘मी १९८५मध्ये मुंबईचा महापौर आणि आमदार झालो होतो. तेव्हा यांचा (मनोज जरांगेंचा) जन्म झाला होता की नाही माहिती नाही. मला तो येवल्याचं येडपट म्हणतो. अरे तू ग्रामपंचायतीचा सरपंच होऊन दाखव.. डोक्यात हवा गेलीय.’
‘गाढवाला एवढ्या उंचीवर घेऊन गेलं कोण? आणि आता सगळे डोक्याला हात लावून बसले आहेत, याला खाली कसं काढायचं,’ अशा शब्दांत भुजबळांनी जरांगे यांच्यावर टीका केली.
‘आता त्यांचं चाललंय काय? मी कुठेही गेलो तरी गावबंदी. घनसांगवी गावात दोन फ्लेक्स लावले होते. एक मराठा आरक्षण गावबंदीचा. दुसऱ्या बाजूला दुसरा बोर्ड होता आमदार रोहित पवारांच्या यात्रेनिमित्त स्वागताचा. बाकिच्यांना गावबंदी आणि पवारांचे स्वागत. तिथे पवारांनी भाषण केले. परंतु, गावातल्या पोराने प्रश्न उपस्थित केला म्हणून त्याला दुसऱ्या दिवशी मारहाण झाली. त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते,’ असे भुजबळ म्हणाले.
‘एकाच पक्षाला मुभा आणि बाकीच्यांना गावबंदी? घटनेच्या १९व्या कलमानुसार कोणी कुणाला अडवू शकत नाही. कोणी कुठेही जाऊ शकतो. त्याला कुणी अडवले तर एक महिन्याची सक्तमजुरीची शिक्षा आहे. बोर्ड निघत नाहीत मात्र ठारावीक लोकांचे स्वागत केले जाते,’ अशा शब्दांत भुजबळ यांनी रोहित पवारांवरही निशाणा साधला. गावबंदी ‘सिलेक्टिव्ह’ असल्याचा दावाही त्यांनी केला.
राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, प्रकाश शेंडगे, पांडुरंग शिंदे, दौलत शितोळे, कल्याण दळे, राजाराम पाटील, शब्बीर अन्सारी, टी. पी. मुंडे, मागास आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके, लक्ष्मण गायकवाड यांची भाषणे झाली. प्रास्तविक ॲड. कृष्णाजी यादव यांनी केले.
राज्यातील विविध भागांतून हजारो ओबीसी बांधव येणार असल्याने प्रशासनाने खबरदारी घेतली होती. नवीन नगर परिषदेच्या इमारतीच्या नजीक मोठा शामियाना उभारला होता. समोरील भव्य प्रांगणामध्ये महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. ठिकठिकाणी मोठे स्वागत फलक लावण्यात आले होते .तब्बल तीनशे पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
भुजबळ काय म्हणाले?
– मराठ्यांना वेगळे आरक्षण द्या, ओबीसींमधून नको.
– आमचा मराठ्यांना विरोध नाही, झुंडशाहीला विरोध.
– आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. आमच्या आरक्षणाला धक्का लावू नका.
– जरांगेसाठी कायदा नाही का? त्याच्यावर कारवाई का होत नाही?
– घटनेनुसार कुणीही कुणाला अडवू शकत नाही.
– आम्ही ओबीसी शूद्र, मग शूद्र होण्यासाठी कुणबी प्रमाणपत्र का मागता?
– तुमचा राग भुजबळांवर असू शकतो, पण तो ओबीसींवर काढू नका.
– गेल्या दोन महिन्यांत दिल्या गेलेल्या कुणबी दाखल्यांना स्थगिती द्या.
– मराठा समाजाला दिले ते ओबीसींना द्या.
– आमचं २७ टक्के आरक्षण भरा. मग तुम्हाला काय करायचे ते करा.