पुणे येथे माध्यमांसोबत बोलताना बावनकुळे म्हणाले होते की, खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी ज्या पद्धतीने विकास केला आहे, ते पाहता गेल्या ५० वर्षात कुणी मतदारसंघाचा असा विकास केला नसेल. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जलसिंचन, रस्ते आदी विभागात उत्तम कार्य झाले आहे. देशातील चांगले काम करणारे जे पहिले ५० खासदार असतील त्यात नाईक निंबाळकर हे निश्चितच असतील. यामुळे निंबाळकर हे त्यांच्या मतदारसंघात निश्चितच ५१ टक्क्यांच्या वर मतं मिळवून विजयी होतील, अशा शब्दात बावनकुळेंनी निंबाळकरांचं तोंडभरुन कौतुक केलं.
उद्या जर आमच्या पार्लमेंटरी बोर्डाने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवार केलं, तर माझा दावा आहे, मी संघटना पाहतो आहे, संघटना एवढी मजबूत आहे आणि त्यांचे काम एवढे जोरदार आहे, की सत्ता आणि संघटन मिळून ते ५१ टक्क्यांची लढाई लढतील. माझा दावा आहे की आजपर्यंत कुणीही घेतली नाहीत एवढी मते घेऊन त्या मतदारसंघातून ते विजयी होतील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक मतदारसंघात मोठी चुरस आहे. भाजपमध्ये अंतर्गत गटबाजीही मोठ्या प्रमाणात दिसत आहे. सोलापूर जिल्ह्यात ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मुलाला किंवा रणजितसिंह निंबाळकर यांना लोकसभेची उमेदवारी मिळू शकते. परंतु या दोघांमध्ये वाढलेली अंतर्गत गटबाजी पक्षाला निवडून देण्यासाठी कितपत फायद्याची ठरेल, हे पाहणं महत्वाचं आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोहिते पाटलांविषयी प्रश्नावर रणजीत सिंह निंबाळकर यांचे कौतुक केलं असून त्यांच्या कामाची सुद्धा वाहवा केली आहे. त्यामुळे हा सगळा प्रश्न भाजप कशा पद्धतीने सोडवणार हे पहावं लागेल. एकेकाळी माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार सुद्धा निवडून आले होते, त्यामुळे शरद पवार यांच्याच शाळेत तयार झालेल्या विजयसिंह मोहिते पाटील यांच्या राजकीय अस्तित्वाचा तर चालू असलेल्या खासदारकीच्या अस्तित्वाचा रणजीत नाईक निंबाळकर यांच्यासमोर प्रश्न निर्माण झाला आहे. भाजपा या ठिकाणी काय करतो हे पाहणं महत्त्वाचं आहे.
Read Latest Pune Updates And Marathi News