• Sat. Sep 21st, 2024

पुणे रेल्वेसाठी साखर कडूच, साखरेचे उत्पादन कमी झाल्याने वाहतूक घटली, रेल्वेला कोट्यवधींचा फटका

पुणे रेल्वेसाठी साखर कडूच, साखरेचे उत्पादन कमी झाल्याने वाहतूक घटली, रेल्वेला कोट्यवधींचा फटका

पुणे : साखर वाहतूक कमी झाल्याचा पुणे रेल्वे विभागाच्या उत्पन्नाला मोठा फटका बसला आहे. साखरेचे उत्पादन कमी झाल्यामुळे परदेशात पाठवली जाणारी साखर वाहतूक कमी झाली आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत साखर वाहतुकीतून रेल्वेला मिळणारे उत्पन्न १९ कोटी रुपयांनी घटले आहे. त्याचा फटका पुणे रेल्वेला मालवाहतुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर झाला आहे.

पुणे रेल्वे विभागाला प्रवासी वाहतुकीनंतर आतापर्यंत सर्वाधिक उत्पन्न साखरेच्या वाहतुकीतून मिळत होते. त्यानंतर पेट्रोलियम पदार्थ आणि ऑटोमोबाइल वाहतुकीतून उत्पन्न मिळत आहे; पण यंदा पश्चिम महाराष्ट्रात साखरेचे उत्पन्न कमी झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे परदेशात साखर निर्यात कमी केली जात आहे. तयार होणारी साखर प्रामुख्याने देशांतर्गतच पाठवली जात आहे. २०२२-२३मध्ये नोव्हेंबरपर्यंत पुणे रेल्वेने २८४ गाड्या (रेक) साखर वाहतुकीच्या पाठविल्या होत्या. त्यातून पुणे रेल्वेला १३७ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. या वर्षी नोव्हेंबरपर्यंत साखरेच्या फक्त १७३ गाड्याच पाठविण्यात आल्या आहेत. त्यातून पुणे रेल्वे विभागाला ११८ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. म्हणजेच यंदा आतापर्यंत १११ गाड्या साखरेची वाहतूक कमी झाली आहे. त्यामुळे उत्पन्नदेखील १९ कोटी रुपयांनी घटले आहे.
कॉफी शॉप बनले अश्लील चाळ्यांचे अड्डे, विद्यार्थी तरुण-तरुणींचा वावर, कॅफेवर पोलिसांची धडक कारवाई
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात साखरेची वाहतूक करणाऱ्या ३७ गाड्या पाठवल्या होत्या. यंदा मात्र फक्त १८ गाड्या पाठविल्या आहेत. साखर दरवाढीचे आंदोलन, कमी पाऊस आणि अंतर्गत वाढलेली मागणी अशा विविध कारणांमुळे उत्पन्न घटल्याचे पाहायला मिळत आहे.

साखर वाहतुकीची ठिकाणे

पुणे विभागातून प्रामुख्याने कोल्हापूर, सातारा, सांगली, कराड, मिरज, लोणंद, बारामती येथून साखरेची वाहतूक करणाऱ्या रेल्वे गाड्या पाठविल्या जातात. त्या प्रामुख्याने ‘जेएनपीटी’ मुंबई व गुजरातमधील कांडला शहरापर्यंत साखर घेऊन जातात. ही साखर परदेशात जहाजाद्वारे पाठवली जाते; पण यंदा उत्पन्न कमी झाल्यामुळे या भागात जाणाऱ्या गाड्या कमी झाल्या आहेत.

ऑटोमोबाइल क्षेत्राचा रेल्वेला हातभार

साखर वाहतूक घटल्याचा रेल्वेला मोठा फटका बसला असला, तरी ऑटोमोबाइल क्षेत्रातील वाहनांची वाहतूक रेल्वेद्वारे वाढली आहे. त्यामुळे रेल्वेला चांगला हातभार मिळाला आहे. त्यामुळे मालवाहतुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नात काहीही घट झालेली नाही. गेल्या वर्षी एप्रिल ते नोव्हेंबरदरम्यान ऑटोमोबाइलच्या ४२१ गाड्या पाठविल्या होत्या. त्यातून ६७.९८ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. यंदा एप्रिल ते नोव्हेंबरदरम्यान ऑटोमोबाइलच्या ५२७ गाड्या पाठविल्या आहेत. त्यातून रेल्वेला ९६.४१ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. ऑटोमोबाइलचे ३० कोटी रुपये उत्पन्न वाढल्याचे दिसून आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पन्नात ४२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Pune News : WhatsApp ग्रुपमधून काढल्याचा राग, पुण्यातील कर्मचाऱ्याची बॉसला मारहाण, iPhone ही फोडला

मालवाहतुकीतून २०२२-२३ नोव्हेंबरपर्यंत रेल्वेला मिळालेले उत्पन्न

प्रकार रेक उत्पन्न (कोटी रुपयांत)

साखर २८४ १३७.७३

पेट्रोलियम २५३ ६३.५६

रेल्वे साहित्य १६४ ६.६०

ऑटोमोबाइल ४२१ ६७.९८

एकूण १,१३६ २७६

मालवाहतुकीतून २०२३-२४ नोव्हेंबरपर्यंत रेल्वेला मिळालेले उत्पन्न

प्रकार रेक उत्पन्न (कोटी रुपयांत)

साखर १७३ ११८.१५

पेट्रोलियम २५३ ६५.३८

रेल्वे साहित्य १७४ ७.२२

ऑटोमोबाइल ५२७ ९६.४१

एकूण १,१३६ २८७

भिडे वाडा पाडला, महात्मा ज्योतिबा फुले-सावित्रीबाई फुलेंचं राष्ट्रीय दर्जाचं स्मारक उभारणार

Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed