• Thu. Sep 17th, 2026
गद्दारांचे पुनर्वसन करण्यावर सरकारचे लक्ष; उद्धव ठाकरेंचा जोरदार घणाघात, शंभुराज देसाई यांचा पलटवार

मुंबई: ‘महाराष्ट्रात सरकार नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रचारात व्यस्त आहेत. दुष्काळात तेरावा महिना म्हणतात, तसे या सरकारचा तेरावा महिना आहे. गद्दारांचे पुनर्वसन कसे करायचे, यावरच त्यांचे लक्ष आहे. जी व्यक्ती आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना मदत करत नाही, ती दुसऱ्या राज्यात, दुसऱ्या पक्षाच्या प्रचाराला जात आहे. अशी व्यक्ती राज्य चालवण्यासाठी नालायक आहे,’ अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नाव न घेता लक्ष्य केले.

राज्याच्या विविध भागांत अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, राज्य सरकारच्या पातळीवर आपत्तीग्रस्तांना मदत देण्याबाबत काही हालचाली होताना दिसत नाहीत. या पार्श्वभूमीवर, उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी तेलंगणात जाऊन भाजप उमेदवाराचा प्रचार केला. त्यावर टीका करताना ठाकरे यांनी शिंदे यांच्या संदर्भात असंसदीय शब्द वापरला. ‘महाराष्ट्रात अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे एक लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. उत्तर महाराष्ट्रात कांद्याचे नुकसान झाले आहे. केंद्र सरकारच्या धोरणामुळे कांदा शेतकरी रडकुंडीला आला होता. आता कांदाच गेला. आज जे मुख्यमंत्री स्वतःचे घर सोडून दुसऱ्याचे घर धुंडाळत आहेत. तेलंगणात जाऊन ते कोणत्या भाषेत बोलणार? सुरत, गुवाहाटीचा प्रकार त्या लोकांना सांगणार आहात का,’ असा सवाल ठाकरे यांनी केला.
निवडणूक तेलंगनाची त्रास मात्र महाराष्ट्रातील तळीरामांना, नेमकं कारण काय? वाचा सविस्तर….
‘इतर राज्यात जाऊन तुम्ही म्हणता, की रामलल्लाचे दर्शन मोफत देणार; पण तुमचे दर्शन महाराष्ट्राला कधी होणार? महाराष्ट्राने काय पाप केले आहे? निवडणुका आल्यावर तिजोरीची दारे उघडतील; पण सध्याच्या परिस्थितीची जबाबदारी घेणार की नाही? आपले पंतप्रधान क्रिकेटच्या अंतिम सामन्याला जातात; मात्र मणिपूरला जात नाहीत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना दमदाटी करायला वेळ आहे, इतर राज्यात रेवडी उडवायला वेळ आहे. पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पाठीवर कधी हात फिरवणार? स्वतः विश्वगुरु तिथे आल्यानंतर तुम्ही काय दिवे लावणार आहात,’ असा टोलाही ठाकरे यांनी लगावला.

‘हे भुरटे राज्याला न्याय देऊ शकत नाहीत. दुसरे दोन हाफ कुठे आहेत माहीत नाही. मग शेवटी या राज्याचा मायबाय कोण आहे? विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी हवामान खात्याने इशारा दिला होता की, या काळात अवकाळी पाऊस होऊ शकतो. त्याबाबत आपल्या मंत्र्यांनी काय केले? आपल्या कृषिमंत्र्यांनी दिवाळीपूर्वी पीकविम्याची अग्रीम रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नाही तर मी दिवाळी साजरी करणार नाही असे जाहीर केले होते. मला तर नंतर ते दिसले नाहीत,’ असा टोलाही ठाकरे यांनी लगावला.

ठाकरे शिवसैनिकांना मदत करत नाहीत; गंभीर आरोप करत नारायण राणेंचा हल्लाबोल

‘उद्धव ठाकरे यांची अवस्था सध्या सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात असंसदीय शब्दाचा प्रयोग केला आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून केलेल्या टीकेची ऑडिओ-व्हिडिओ क्लिप मागविण्यात आली आहे. कायदेतज्ज्ञ आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्याशी चर्चा करून यासंदर्भात पुढचा निर्णय घेण्यात येईल,’ अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed