वंचित बहुजन आघाडीने शिवाजी पार्कवर आयोजित केलेल्या संविधान सन्मान रॅलीमध्ये अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी केंद्रातील मोदी सरकार; तसेच राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी केसरकर यांनी अचानक दादर येथील ‘राजगृह’ या निवासस्थानी त्यांची भेट घेतील. दोन नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. त्यानंतर केसरकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधून भेटीमागचे कारण स्पष्ट केले. ‘आज संविधान दिन आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांना भेटून शुभेच्छा दिल्या. मुंबईचा पालकमंत्री म्हणून मी नेहमीच त्यांच्या संपर्कात असतो. राज्यातील विचारवंतांमध्ये आंबेडकर यांचे विचार महत्त्वाचे आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जपण्याकरिता आमच्यात समन्वय आहे,’ असे ते म्हणाले.
संविधान दिनानिमित्त ही भेट घेतल्याचे केसरकर सांगत असले तरी आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने या वेळी चर्चा झाल्याचे समजते. या निवडणुकीमध्ये ‘एनडीए’विरोधात विरोधकांची ‘इंडिया’ आघाडी तयार झाली आहे. साहजिकच राज्यातही महाविकास आघाडीविरोधात महायुती असे चित्र आहे. आघाडीमधील शिवसेनेसोबत आंबेडकर यांची चर्चा सुरू आहे. त्यामुळे त्यांना आपल्याकडे कसे वळवता येईल, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रयत्न सुरू असल्याचे समजते. यासाठीच केसरकर त्यांच्या निवासस्थानी पोहोचल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, हिंगोलीत ओबीसी एल्गार परिषदेला जात असताना मंत्री छगन भुजबळ यांचा ताफा तीन वेळा अडवण्यात आला. त्यावरही केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली. ‘हा संघर्ष थांबला पाहिजे. कोणत्याही गोष्टीसाठी महाराष्ट्र अस्वस्थ ठेवायचा याला काही मर्यादा आहेत. मुलांचे भविष्य महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र शांत राहिला नाही तर गुंतवणूकदार येणार नाहीत,’ असे ते म्हणाले.
मनसेने आजपासून मराठी पाट्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे. त्यावर, ‘दुकानांवर मराठी पाट्या असणे आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाने पुरेशी मुदतही दिली आहे. जे मराठी पाट्या लावणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई केली जाईल; तसेच कोणी दुकानांवरील पाट्यांना काळे फासले तर त्यांच्यावरही कारवाई होईल,’ असे केसरकर म्हणाले.
Read Latest Maharashtra News And Marathi News
