राजू शेट्टी यांनी सर्वात आधी आऊची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. आंदोलनाची सुरुवात करताना देखील राजू शेट्टी यांनी आऊचे आशीर्वाद घेऊनच आंदोलन सुरू केले होते.
गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून राजू शेट्टी यांच्या आऊ आजारी आहेत. त्यामुळे राजू शेट्टी यांना आंदोलन सुरू करताना त्यांच्या प्रकृतीची काळजी लागली होती. मात्र “राजू तू चालून ये, मला काही होणार नाही…” असे सांगत आऊने त्यांना आशीर्वाद दिले होते.
आंदोलनात यश मिळाल्यानंतर घरी जाऊन आऊचे आशीर्वाद घेताना राजू शेट्टी भावूक झाले. आऊनेही आपल्या मुलाला हार घालत औक्षण केल्याचे पाहायला मिळाले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे गेल्या दोन महिन्यांपासून ऊस दरासाठी आंदोलन करत होते. काल सकाळपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरत आंदोलन केलं होतं. या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयात संध्याकाळच्या सुमारास साखर कारखानदार आणि राजू शेट्टी यांचे प्रतिनिधी यांच्यात चर्चा पार पडली आणि अखेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी साखर कारखानदारांनी मान्य केली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेल्या मागणीला यश मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांनी राजू शेट्टी यांच्यावर फुलांची आणि गुलालाची उधळण करत एकच जल्लोष केला. मात्र यातील काही अतिउत्साही आणि मद्यपान केलेल्या कार्यकर्त्यांनी धिंगाणा घालत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही कार्यकर्त्यांनी राजू शेट्टी यांना खांद्यावर उचलून घेतले असताना धक्काबुक्की केल्याने राजू शेट्टी यांचा रस्त्यावर तोलदेखील गेला. यावेळी माध्यम प्रतिनिधींनीसोबतही धक्काबुक्कीचा प्रकार घडला. त्यानंतर राजू शेट्टी यांनी दिलगिरीही व्यक्त केली.
Read Latest Kolhapur Updates And Marathi News