• Sat. Sep 21st, 2024

शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला अखेर यश; ‘स्वाभिमानी’च्या मागण्या मान्य, ऊस दराची कोंडी फुटली

शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला अखेर यश; ‘स्वाभिमानी’च्या मागण्या मान्य, ऊस दराची कोंडी फुटली

कोल्हापूर: ऊस हंगामाची कोंडी अखेर गुरुवारी रात्री फुटली. गेल्या हंगामात तुटलेल्या ऊसाला ज्या कारखान्यांनी ३ हजार पेक्षा कमी रक्कम दिली आहे त्यांनी टनास १०० रुपये आणि ज्यांनी ३ हजार रुपये दिले आहेत त्यांनी किमान आणखी ५० रुपये देण्यास जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी संमती दिल्याने ऊस दराबाबत सुरू असलेली कोंडी फुटली. यासाठी स्वाभिमानी संघटनेने गुरुवार सकाळपासून पुणे-बेंगळुरू महामार्गावरील चक्काजाम आंदोलन केले होते. हे आंदोलन देखील ९ तासानंतर मागे घेण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत झालेल्या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागण्या मान्य करम्यात आल्या. पुढील दोन महिन्यात याला मुख्यमंत्र्यांकडून मान्यता देण्यात येणार असल्याचे या बैठकीनंतर सांगण्यात आले. या संदर्भात सर्व जोपर्यंत सर्व साखर कारखानदार पत्र काढत नाही तोपर्यंत कारखाने सुरू होऊ देणार नाही असे, माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.

ऊस दर आंदोलन: राजू शेट्टींच्या आंदोलनाला छत्रपती शाहू महाराजांचे बळ; म्हणाले- शेतकऱ्यांना हक्काचं आहे ते मिळालं पाहिजे
गेल्या आठ तासापासून सुरू असलेल्या राजू शेट्टी यांच्या राष्ट्रीय महामार्ग रोको आंदोलन अखेर मागणी मान्य झाल्यानंतर अखेर थांबवण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत साखर कारखानदारांनी मागणी मान्य केल्याने राजू शेट्टी यांच्या आंदोलनाला यश प्राप्त झाले. मागील हंगामात ज्या कारखान्यांनी तीन हजारांच्या आतमध्ये दर दिला आहे त्यांनी १०० रुपये तर ३ हजार पेक्षा जास्त दर देणाऱ्या कारखान्यांनी मागील हंगामातील ५० रुपये देण्याचा प्रस्ताव एकमताने मान्य करण्यात आलाय. हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात येणार आहे. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला अखेर दोन महिन्यानंतर यश आल्याने फटाके फोडून आणि राजू शेट्टी यांच्यावर फुलांची आणि गुलालाची उधळण करत जल्लोष साजरी करण्यात आला आहे.तर यापुढे आपला मोर्चा सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्याकडे वळवणार असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी केली आहे.

सकाळपासून पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला

सकाळी अकरा वाजल्यापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरत चक्काजाम आंदोलन करत होते. गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेलं हे आंदोलन पदयात्रा , ठिय्या आंदोलन, चक्काजाम आंदोलन करत आज महामार्ग रोखण्यापर्यंत आले. गेल्या वर्षीचा उसाला चारशे रुपये आणि यंदाचे पहिले उचल ३५०० द्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आली होती मात्र ही मागणी मान्य करण्यास साखर कारखानदार तयार न्हवते. यामुळे अर्धा महिना संपला तरी कोल्हापुरात कारखाने अद्याप सुरू झाले नव्हते. यामुळे आंदोलनाला अनेक ठिकाणी हिंसक वळण देखील लागलं होतं या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी, पालकमंत्री, शेतकरी संघटना आणि साखर कारखानदार यांच्या बद्दल तीन वेळा बैठक पार पडली मात्र ते निष्फळ ठरली तर काल सहकार मंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीत देखील कोणताही तोडगा न निघाल्याने राजू शेट्टी यांनी आक्रमक पवित्रा घेत आज सकाळपासून पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला.

तोडगा निघाला मात्र पत्र येईपर्यंत कारखाने सुरू होऊ देणार नाही

अकरा वाजल्यापासून सुरू झालेल्या या आंदोलनाला श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी देखील येऊन पाठिंबा दर्शवला आणि लवकरात लवकर यावर तोडगा निघावा यासाठी वरिष्ठांनी मध्यस्थी करावी अशी अपेक्षा व्यक्त केली यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधी आणि साखर कारखानदार यांच्यात झालेल्या बैठकीत अखेर तोडगा निघाला. मागील हंगामात ज्या कारखान्यांनी तीन हजारांच्या आतमध्ये दर दिला आहे त्यांनी १०० रुपये तर ३००० पेक्षा जास्त दर देणाऱ्या कारखान्यांनी मागील हंगामातील ५० रुपये देण्याचा प्रस्ताव एकमताने मान्य करण्यात आला. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व कारखानदारांचे परवानगी पत्र जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांना देण्याचे आदेश देण्यात आले असून सर्व कारखान्यांची पत्र आल्यानंतर तसा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवण्यात येणार आहे. तर जिल्ह्यातील सर्वच कारखानदारानी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पहिली उचल ३१०० रुपये द्यावी, शिवाय जोपर्यंत सर्व कारखान्याचे मागील तुटलेल्या उसाला १०० रुपये उसाचे पत्र येत नाही. तोपर्यंत कारखाने सुरू होऊ देणार नाही अशी भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली आहे.

जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्या पत्रक काय?

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मागील हंगाम सन २०२२-२३ मधील शेतक-यांना मिळालेल्या ऊसाच्या दराविषयी जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटनांची आंदालने सुरु झाली होती. त्याविषयी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने, आंदोलक संघटना आणि प्रशासन यांच्यामध्ये झालेल्या चर्चेमध्ये ठरविण्यात येत आहे की, मागील हंगामामध्ये शेतक-यांना ऊसाचा दर प्रतीटन रुपये ३००० पेक्षा कमी दर ज्या साखर कारखान्यांनी दिलेला आहे. त्यांनी मागील हंगामातील शेतक-यांना रुपये १०० रुपये अतिरिक्त प्रती टन द्यावे.ज्यांनी रूपये ३००० पेक्षा जास्त दर प्रती टन दिलेला आहे. त्या साखर कारखान्यांनी रुपये ५० रुपये प्रतीटन अतिरिक्त शेतक-यांना द्यावेत. याबाबीसाठीचा प्रस्ताव शासनाकडे त्वरित साखर कारखान्यांनी पाठवावा. पुढील दोन महिन्यांमध्ये त्यास मान्यता देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरच्या पालकमंत्र्यांना दिलेले आहे.

Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed