• Sat. Sep 21st, 2024

मांडी थोपटाल, तर दंड थोपटू! मनोज जरांगेंची इगतपुरीत तोफ धडाडली, भुजबळांचा परखड भाषेत समाचार

मांडी थोपटाल, तर दंड थोपटू! मनोज जरांगेंची इगतपुरीत तोफ धडाडली, भुजबळांचा परखड भाषेत समाचार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : ‘जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांना राज्य सरकारने आताच आवरावे. मराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी कुणी मांडी थोपटली, तर आम्हीही दंड थोपटायला मागे-पुढे पाहणार नाही,’ असा इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी बुधवारी नाशिकमधील सभेतून दिला.

जालना जिल्ह्यातील अंबडच्या ओबीसी एल्गार मेळाव्यातून मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध दर्शवून जरांगे-पाटील यांचा समाचार घेतला होता. त्याची परतफेड त्यांनी भुजबळांच्या बालेकिल्ल्यात तोफ डागून केली. मराठा आरक्षणाच्या वाटेला गेलात, तर आता वाजिवलाच म्हणून समजा, अशा बोलीभाषेतच जरांगे-पाटील यांनी विरोध करणाऱ्यांना सज्जड दम भरला. आरक्षण घेतल्याशिवाय सरकारची सुट्टी नाही, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला.

मराठा आरक्षणासाठी लढा उभारणाऱ्या जरांगे-पाटील यांचे राज्यभर दौरे सुरू आहेत. बुधवारी त्यांची नाशिकमध्ये सभा होती. इगतपुरी तालुक्यातील शेणीत फाटा येथे त्यांची सभा झाली. ५० एकर क्षेत्रावर झालेल्या या सभेला हजारोंच्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते. व्यासपीठावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनारूढ पुतळ्याचे पूजन करून जरांगे-पाटील यांनी माइकचा ताबा घेतला. सलग एक तास दहा मिनिटांच्या भाषणात त्यांनी राज्य सरकार, पोलिस आणि ओबीसी नेत्यांच्या भूमिकेचा परखड भाषेत समाचार घेतला. आंतरवली सराटी येथील महिला आंदोलकांची डोकी फोडणाऱ्या पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांना बडतर्फ केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे त्यांनी राज्य सरकारला ठणकावले. आमच्यावर हल्ला का केला याचे उत्तर अजूनही सरकारला देता आले नसल्याचे ते म्हणाले. मराठा समाजाला आरक्षण होतेच, परंतु त्याचे लाभ जाणूनबुजून दिले गेले नाहीत, असा आरोपही त्यांनी केला.

‘त्या’ मंत्र्याचे अजून उत्तर नाही

ते एकटं म्हातारं आरक्षणासाठी बसलंय, अशी टीका करीत जरांगे-पाटील यांनी भुजबळांचे नाव न घेता त्यांच्यावर तोफ डागायला सुरुवात केली. मी उपोषणाला बसलो असताना एक मंत्री माझ्याजवळ आला आणि मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देता येणार नाही, असं म्हटला. त्याचवेळी सभेत बसलेले लोक भुजबळांच्या विरोधात घोषणा देऊ लागले. अरे त्याची माझ्याकडे येण्याची टप्पर नाही, असा टोला जरांगे-पाटील यांनी लगावला. मराठ्यांची पोटजात कुणबी होत नाही का, असा मी त्या मंत्र्याला केला होता. त्याने अजून त्याचे उत्तर दिले नसल्याचे त्यांनी सांगितले. सरकारशी जुळवून घेऊन संबंध चांगले ठेवण्यासाठी मी आंदोलन उभे केलेले नाही. आपल्या रक्तात गद्दारी नसल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.

मराठे सर्वांकडूनच वाऱ्यावर

मराठ्यांनी अनेक नेते आणि राजकीय पक्षही मोठे केले. परंतु, मराठ्यांवर जेव्हा वेळ आली तेव्हा सर्वांनीच त्यांना वाऱ्यावर सोडले. मराठा गाफील राहिल्याने ७० वर्षे आरक्षण मिळू शकले नाही, अशी खंत जरांगे-पाटील यांनी व्यक्त केली. मी जीवाची बाजी लावून हे आंदोलन उभे केले आहे. अनेक जण मला शत्रू मानत आहेत. त्यामध्ये काही मराठा नेतेदेखील आहेत. परंतु, मी त्यांना भीत नाही. सरकारच्या छाताडावर बसून आरक्षण घेऊ. जीव गेला, तरी आरक्षण मिळवून दिल्याशिवाय एक इंचही मागे हटणार नाही. भागवताचार्य शिवा महाराज नाणेगावकर यांनी या सभेचे सूत्रसंचालन केले.

दंगली घडवून स्वार्थाचे मनसुबे

काही नेत्यांनी महाराष्ट्र सदन ओरबाडले. त्यांना जेलमध्ये जावे लागले. या नेत्यांची लायकी नसल्याने आपण त्यांचे नाव घेत नाही, अशी टीका जरांगे-पाटील यांनी केली. आधी आमचा भुजबळांच्या विचाराला विरोध होता. परंतु, घटनात्मक पदावर बसून ते कायदा पायदळी तुडवीत असल्याने व्यक्ती म्हणूनही त्यांना यापुढे विरोधच राहील, असेही ठणकावले. अंबड येथील एल्गार मेळाव्यात तुमच्या पोटातील गटारगंगा बाहेर काढून तुम्ही तुमची लायकी दाखवली, अशी जळजळीत टीकाही त्यांनी केली. तुम्हाला तुमच्या समाजाबद्दल एवढी आस्था आहे, तर तुमच्या एकाही महाविद्यालयाला सावित्रीबाई फुले यांचे नाव का दिले नाही, असा सवाल जरांगे-पाटील यांनी भुजबळांचे नाव न घेता उपस्थित केला. सध्याची वेळ संयमाने पुढे जाण्याची असून, आपण शांततेत लढा पुढे न्यायचा आहे. जाती-जातींत दंगली घडविण्याचे राजकीय षडयंत्र मराठ्यांनी यशस्वी होऊ देऊ नये, अशी विनंतीही त्यांनी केली.

आरक्षण मिळू द्या, मग तुमच्याकडे पाहू

भुजबळांचं वय झालं असून, त्यांनी आता शांतता घ्यावी. त्यांनी कुठे भाजी विकली, कुणाचे बंगले हडपले हे सगळं आम्हाला माहीत असून, उगीच आग्यामोहोळाला डिवचण्याचं काम भुजबळांनी करू नये. गावबंदीचे फलक हटविण्याच्या भुजबळांच्या मागणीचाही जरांगे-पाटील यांनी समाचार घेतला. ते बोर्ड तुम्हाला चावतात का? की त्यामुळे तुमची गाडी आत येत नाही? असे सवाल त्यांनी उपस्थित केले. आरक्षण मिळाले, की आपण सर्व एकाच गल्लीत येणार आहोत. आरक्षण मिळू द्या, मग विरोध करणाऱ्यांकडे पाहू, असा इशाराही जरांगे-पाटील यांनी दिला.

डिसेंबरपासून गाव तेथे साखळी उपोषण

एक डिसेंबरपासून प्रत्येक गावात साखळी उपोषण सुरू करावे. गाव तेथे साखळी उपोषण हा आंदोलनाचा पुढील टप्पा असल्याचे जरांगे-पाटील यांनी जाहीर केले. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राज्य सरकारने एकही नोकरभरती न करण्याचा शब्द दिला आहे. मात्र, तरीही नोकरभरती करायची असेल, तर मराठ्यांच्या हक्काच्या जागा वगळून इतर जागांसाठी भरतीप्रक्रिया राबवावी, अशी मागणीही त्यांनी केली. २४ डिसेंबरनंतर काय भूमिका घ्यायची हे अजून ठरलेले नाही. पण, जे करू ते गनिमी काव्याने, असा इशारादेखील त्यांनी दिला. मराठा जातीसाठी मी एक इंचही नियत ढळू दिली नसल्याचे त्यांनी सांगितले.

तरुणींचे आक्रमक मनोगत

जरांगे-पाटील सभास्थळी येण्यापूर्वी स्नेहल कदम, तृष्णा पवार, योगिता एखंडे यांच्यासह प्रदीप सोळुंके, नितीन डांगे आणि अन्य काही तरुणींनी आक्रमकपणे आरक्षणाबाबतची मते मांडली. भुजबळांच्या सोन्याच्या लंकेचे मराठे दहन करतील, असा इशारा या तरुणींनी दिला. महाराष्ट्र आमच्या सातबाऱ्यावरच लिहून दिला असून, आमचा बाप छत्रपती शिवाजी महाराज असल्याचे कदम म्हणाल्या. भुजबळांना आम्ही देव मानायचो, पण आता पायाची धूळही मानत नाहीत, अशी टीका यावेळी करण्यात आली.

जरांगे-पाटलांचे समाजबांधवांना आवाहन…

-आपापसातील तंटे बाजूला ठेवून जातीसाठी एकत्र या
-अधिकारी व गरीब कुटुंबातील मराठ्यांकडून सभांसाठी पैसे गोळा करू नका
-महिलांनीही संकोच न करता आरक्षणाचा संदेश अन्य महिलांपर्यंत पोहोचवावा
-घराघरांतील मराठ्यांनी आरक्षण समजून घ्यावं
-लक्ष विचलित होऊ देऊ नका
-माझं शरीर मला साथ देत नाही, मला रस्ता मोकळा करून द्या
-जातीसाठी दुकानदारी बंद ठेवा
-संयम बाळगा, आपापसात वाद नकोत
जरांगेंची आरक्षित जातींच्या विरोधात अपमानजनक वक्तव्ये, जाती जोडो अभियानाचे धनंजय कानगुडे यांचा आरोप
-तब्बल चार तास उशिराने जरांगे-पाटलांचे सभास्थळी आगमन
-ठिकठिकाणी स्वागतामुळे सभास्थळी पोहोचण्यास विलंब
-एक मराठा लाख मराठा संदेश असलेल्या भगव्या टोप्या परिधान करून लोक सभास्थळी
-जरांगे-पाटील यांचे मराठा कार्यकर्त्यांकडून धूमधडाक्यात स्वागत
-जरांगे-पाटील यांना व्यासपीठावर आणण्यासाठी विशेष रॅम्प
-सभास्थलासह ठिकठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
-उत्तम गायकर, स्वप्निल डुंबरे यांच्या पोवाड्यांनी भरला उपस्थितांत जोश
-शंकर दाभाडे यांनी सादर केली भक्तिगीते
-नाशिक, इगतपुरी, सिन्नर तालुक्यांतील ६७ गावांमधील रहिवाशांनी लोकवर्गणीतून केला सभेचा खर्च
-लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची, मसालेभात, पुरीभाजीची मुबलक व्यवस्था
-आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी खासगी हॉस्पिटल्सची सुसज्ज पथके
-३० ते ३५ हजार नागरिकांनी सभेला हजेरी लावल्याचा अंदाज
-महिलांनी पाहुणीला साड्या नेसविणे बंद करून पुस्तके भेट देण्याचे केले आवाहन
-प्रत्येक मराठ्याच्या घरात तुकारामांची गाथा आणि शिवचरित्र असावेच
-‘गरजवंत मराठ्यांचा लढा’ हा व्यासपीठावरील फलक ठरला लक्षवेधी
-सभेच्या ठिकाणी सोन्याची चेन गहाळ, तर काहींचे मोबाइल गेले चोरीला

…या घोषणांनी दुमदुमला परिसर

-तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय
-रक्तारक्तात भिनलंय काय, जय जिजाऊ जय शिवराय
-एक मराठा लाख मराठा नाही, तर आता एक मराठा कोटी मराठा
-आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं
-कोण म्हणतं देत नाय, घेतल्याशिवाय राहात नाय
-आपला कार्यक्रम आपली जबाबदारी
-या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय
-इथून पुढचं आंदोलन कसं, जरांगे-पाटील म्हणतील तसं
-जो मराठा के हित की बात करेगा, वो महाराष्ट्रपे राज करेगा
-मराठा खडा, तो सरकारसे भी बडा
-एकच मिशन, मराठा आरक्षण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed