दुष्काळाबाबत बोलताना पवार म्हणाले की, दुष्काळाबाबत राज्य सरकारने सुरुवातीला निकाल जाहीर केला. त्यामध्ये अनेक तालुक्यांमध्ये पाऊस – पाणी नाही. जनावरांचे हाल आहेत. सामान्य लोकांचे हाल आहेत. योग्य प्रकारची माहिती केंद्र सरकारला पोहोचवायची होती. ती माहिती राज्य सरकारला पोहोचवण्यात कमतरता आली म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांच्या कानावर सुद्धा हा प्रश्न मांडला. त्यानंतर यामध्ये दुरुस्ती करण्याची भूमिका त्यांनी स्वीकारली आहे. पुढील दोन-तीन दिवसात काहीतरी होईल अशी अपेक्षा आहे असे पवार म्हणाले.
शिवसेना ठाकरे व शिंदे गटावर बोलताना पवार म्हणाले की, अनेक वर्षांपासून ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा गड आहे. त्या ठिकाणी त्यांची संघटना मजबूत आहे. दुर्दैवानं अनेक वर्षांपासून त्यांचं जे ऑफिस होतं ते बुलडोझरने तोडले गेले. माझ्यामते असल्या गोष्टी थांबवाव्यात. राज्याच्या प्रमुखांकडून हीच अपेक्षा असते की, त्यांनी राज्याचे प्रमुख म्हणून सर्वांना बरोबर घेण्याची भूमिका घ्यायला हवी. अशाप्रकारे कार्यालय तोडणे ही भूमिका योग्य नाही.
पूर्वी राजकारणात हिंदू-मुस्लिम वाद पेटविले जायचे. सध्या मराठा-ओबीसी वाद पेटवला जात आहे का? असा प्रश्न केला असता पवार म्हणाले की, मला असे वाटते की, ओबीसी आणि मराठा वाद नाही. काही लोक तसे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, सर्वसामान्य लोकांना यात रस नाही. त्यांचे जे प्रश्न आहेत. मग ते सुटले पाहिजेत मग ओबीसी असेल मराठा असेल. त्यांचे न्याय प्रश्न सोडवण्याची खबरदारी राज्य आणि केंद्र सरकारने करावी. अशी त्यांची अपेक्षा आहे.
दरवर्षी पाडव्या दिवशी संपूर्ण पवार कुटुंबीय एकाच व्यासपीठावर असते. मात्र यंदाच्या वर्षी उपमुख्यमंत्री अजित पवार आमदार रोहित पवार यांच्या अनुपस्थितीबाबत विचारले असता पवार म्हणाले की, रोहित पवारांचा संघर्ष युवा यात्रा दौरा सुरू आहे. प्रत्येकाची काही प्रश्न आहेत. कोणाचा आजार असेल. त्यामुळे गैरहजर राहिले. म्हणून गैरसमज करण्याचे काही कारण नाही. असे म्हणत पवारांनी अजित पवारांच्या अनुपस्थिती बाबत बोलणे टाळले.
Read Latest Maharashtra News And Marathi News