माझं मुळात म्हणणं हे आहे की, मराठा समाजाला ३७२ जाती असलेल्या ओबीसी प्रवर्गात येऊन फार काही फायदा मिळणार नाही. मराठा समाज ओबीसीत आला की ओपन (खुल्या) प्रवर्गात फार जाती राहणार नाहीत. म्हणजे जिथे नोकऱ्यांचा आणि सोयीसवलतींचा विषय येतो, त्या पातळीवर मराठा समाजाचे फार मोठे नुकसान होईल. अशा परिस्थितीत मराठा तरुणांनी अभ्यास करुन, थोडा विचार करुन, आपण कोणाला साथ देतोय, आपलं भलं कशात आहे, याचा विचार करावा, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले.
मनोज जरांगे पाटलांवर वडेट्टीवारांची टीका
अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर जो लाठीमार झाला त्यानंतर मनोज जरांगे पाटील हिरो म्हणून पुढे आले. त्यानंतर ‘हम झुका सकते है’ अशी भावना मनोज जरांगे यांच्या मनात निर्माण झाली. मराठा समाजाने दिलेल्या पाठबळामुळे त्यांच्या मनात गर्व निर्माण झाला. त्यामुळे मनोज जरांगे पाटील राज्य सरकारला धमकावत राहिले. इतक्या तारखेनंतर आरक्षण द्या, नाहीतर बघून घेऊ, तुम्ही रस्त्यावर कसे फिरता, हे बघतो, अशा धमक्या ते देत राहिले. पण या धमक्यांनी प्रश्न सुटणार आहेत का? कुठल्याही गोष्टी कायद्याच्या चौकटीत बसून कराव्या लागतात, कायद्याला धरुन कराव्या लागतात. ज्या काही प्रक्रिया आहेत, त्यानुसार कोणालाही कुठेही घुसवता येत नाही. पण आता त्यांच्या डोक्यात हे खुळ घुसलंच असेल तर ते मागणी सातत्याने करत राहतील. मग आता सगळ्यांनाच कुणबी प्रमाणपत्र देऊन टाका. मग गुजराती कुणबी, मारवाडी कुणबी, लिंगायत कुणबी, असंच होऊन जाऊ दे, अशी खोचक टिप्पणी विजय वडेट्टीवार यांनी केली.