महाड एमआयडीसीमध्ये आपत्कालीनप्रसंगी उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक साधनांच्या वापरासाठी प्रशिक्षित मनुष्यबळच नसल्याच्या मर्यादा या दुर्घटनेमुळे स्पष्ट झाल्या आहेत. शुक्रवारी दुपारी घटना घडल्यानंतरही पुण्याहून एनडीआरएफचे पथक दाखल होईपर्यंत आतमध्ये अडकलेल्या कामगारांचा शोध सुरू होऊ शकला नाही. त्यामुळे शोधमोहीम राबवण्यासाठी रात्री साडेदहा ते अकरा वाजले होते. एमआयडीसीमध्ये रसायन कंपन्या असूनही आणि या ठिकाणी यापूर्वीही अनेक दुर्घटना घडल्यानंतरही अत्यावश्यक अत्याधुनिक सामग्री तसेच आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ नसल्याने शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत पुण्यातून येणाऱ्या एनडीआरएफ पथकाची केवळ प्रतीक्षाच करण्यात येत होती.
महाड एमआयडीसीमध्ये गेल्याच महिन्यात ५ ऑक्टोबरला प्रसोल कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात वायू गळती झाली होती. त्यावेळी एका कामगाराचा मृत्यू झाला होता. तर नाइट शिफ्टला असलेले ५ कामगार या विषारी वायूमुळे जागीच बेशुद्ध पडले होते. या घटनेला महिना होत नाही, तोपर्यंत ही दुसरी भीषण दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेमुळे परिसरातील नागरिकांकडून मोठा संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे येथील आपत्कालीन यंत्रणा तातडीने सक्षम आणि प्रशिक्षित करण्याची कार्यवाही करण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.
चौकशीसाठी समिती स्थापन करणार
या दुर्घटनेनंतर रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे पाटील यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्याची तयारी सुरू केली आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली महाड औद्योगिक विभागाचे अधिकारी, प्रदूषण नियंत्रण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, पोलिस अधिकारी यांचा समावेश यंत्रणांच्या अधिकाऱ्यांच्या समावेश असलेली चौकशी समिती स्थापन करण्यात येणार आहे. १५ दिवसांमध्ये या समितीचा अहवाल येईल व त्यानंतर या चौकशीमध्ये कंपनी प्रशासनाची हलगर्जी आढळल्यास त्यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती म्हसे पाटील यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना दिली.
Read Latest Maharashtra News And Marathi News