• Sat. Sep 21st, 2024

२०२४ लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा खास प्लॅन, प्रत्येक मतदारसंघावर करडी नजर, नेमकं काय करणार?

२०२४ लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा खास प्लॅन,  प्रत्येक मतदारसंघावर करडी नजर, नेमकं काय करणार?

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ‘महाविजय २०२४’ ही मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत पक्षाने आपली रणनीतीही आखली आहे. त्यानुसार राज्यभरात वॉर रूमचे जाळे तयार केले जाणार आहे. या वॉर रूमच्या माध्यमातून विधानसभेच्या २८८ आणि राज्यातील लोकसभेच्या सर्व ४८ मतदारसंघांवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे.

वॉर रूमच्या माध्यमातून केंद्रातील मोदी सरकार आणि राज्य सरकारची कामे लोकांपर्यंत कशी पोहोचतील याची खातरजमा भाजप करणार आहे. याशिवाय भाजप वॉर रूमच्या माध्यमातून प्रत्येक मतदारसंघ आणि तेथील उमेदवारांवर लक्ष ठेवणार आहे; तसेच प्रत्येक मतदारसंघातील समस्या आणि विषयांची माहितीही या माध्यमातून घेणार आहे. भाजप आमदार श्रीकांत भारतीय यांनी या वॉर रूमबाबत सविस्तर प्रतिक्रिया दिली. ‘भाजप ३६५ दिवस निवडणुकीची तयारी करणारा पक्ष आहे. भाजपने २०१४पासून निवडणूक व्यवस्थापनामध्ये एक वैशिष्ट्य तयार केले आहे. त्यामुळे २८८ विधानसभा मतदारसंघांत २८८ वॉर रूम तयार करीत आहोत. भाजप २८८ विधानसभा आणि ४८ लोकसभा मतदारसंघांत तयारी करत आहे. ही तयारी महायुतीसाठी आहे,’ असेही भारतीय यांनी स्पष्ट केले.

लोकसभेला महायुती किती जागा जिंकणार, एकनाथ शिंदे यांची विरोधकांची टेन्शन वाढवणारी घोषणा

‘एखादा मतदारसंघ महायुतीतील मित्रपक्षाकडे असेल, तर ती जागाही निवडून आणण्याची जबाबदारी भाजपची आहे. त्यादृष्टीने आम्ही या वॉर रूम तयार करत आहोत. या वॉर रूममध्ये तीन प्रकारच्या जबाबदाऱ्या देण्यात येणार आहेत. त्या म्हणजे, टेक्नॉलॉजीचा वापर करणे, अधिक गतिमान पद्धतीने निवडणूक व्यवस्थापन करणे आणि केंद्र व राज्यातील योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे. प्रत्येकी एक कमांड सेंटर तयार केले आहे. केंद्राचे सर्व व्यवस्थापन हे प्रत्येक वॉर रूमपर्यंत पोहोचवण्याचे काम केले जाईल,’ अशी माहिती भारतीय यांनी दिली.

एकूण ४५ जागांवर विजयाचा संकल्प

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी नुकतीच सत्ताधारी शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार-खासदारांची बैठक पार पडली. या बैठकीत तीनही पक्षाच्या लोकप्रतिनिधींना लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना करण्यात आल्या. त्यानंतर आता भाजपही जोरदार कामाला लागला आहे. केंद्रात पुन्हा स्वबळावर भाजपचे सरकार आणण्यासाठी राज्यातून अधिकाधिक खासदार निवडून आणून रसद पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार राज्यातील ४८पैकी ४५ जागांवर विजयाचा संकल्प करण्यात आला आहे.

कीर्तिकरांनी लोकसभेला उमेदवारी नाकारल्यास पर्याय कोण? रामदास कदमांनी नाव जाहीर केलं, म्हणाले…

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे किंवा शिवसेनेचे जिथे उमेदवार असतील, तिथेही भाजपची वॉर रूम त्यांच्या विजयासाठी काम करील. हे सर्व पंतप्रधान मोदी यांचेच हात बळकट करणार असल्याने त्यांच्या विजयासाठी ताकद लावण्यात येईल.

– श्रीकांत भारतीय, भाजप नेते, आमदार

काटेवाडी ग्रामपंचायतीमध्ये BJP Vs NCP, लोक म्हणाले, १०० टक्के लोक सुमित्रा ताईंच्या शब्दाला किंमत देतात!

Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed