• Sat. Sep 21st, 2024

Nashik Water : नाशिककरांवर पाणी कपातीचे संकट? महापालिकेला नव्याने पाणी नियोजन करावे लागणार

Nashik Water : नाशिककरांवर पाणी कपातीचे संकट?  महापालिकेला नव्याने पाणी नियोजन करावे लागणार

नाशिक : पावसाने ओढ दिल्याने नाशिक शहरावर पाणी टंचाईचे संकट कायम होते. त्यातच गंगापूर आणि दारणा धरण समूहातून जायकवाडीसाठी ३ टीएमसी पाणी सोडावे लागणार असल्याने नाशिककरांवर यंदा पाणी टंचाईचा सामना लवकर करावा लागू शकतो. यामुळे महापालिकेला पाणी वाटपाचे नियोजन करावे लागणार असून, नाशिककरांना यंदा पाणी कपातीला सामोरे जावे लागू शकते. पाणी सोडण्याबाबत नाशिककरांच्या भावना तीव्र असल्याने जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता बळावली असल्याने जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.

जायकवाडीसाठी ३१ ऑक्टोबरपासून दारणा आणि गंगापूर धरण समूहातून ७ नोव्हेंबरपर्यंत ३.१४३ टीएमसी पाणी सोडले जाणार आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत ५५ हजार २९६ दशलक्ष घनफुट म्हणजेच ८४ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. जुलै २०२४ पर्यंत हा पाणीसाठा पुरविण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर असतानाच आता उपलब्ध पाणी साठ्यातून ३.१४३ टीएमसी पाणी जायकवाडी धरणासाठी सोडा लागणार असल्याने साधारण ५२ हजार दशलक्ष घनफूट पाणी जिल्ह्यातील धरणात शिल्लक असेल. हे पाणी जुलै २०२४ पर्यंत पुरेल याचे नियोजन जिल्हा प्रशासनाला करावे लागणार आहे. यामुळे धरणांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या नाशिकवर पाणीकपातीचे संकट गडद झाले आहे. तर नाशिक शहराला प्रतीदिन ५५५ दशलक्ष लिटर पाण्याची गरज लागते. यादृष्टीने जुलै २०२४ पर्यंत नाशिककरांना साधारण ५ हजार दशलक्ष घनफूट लिटर पाण्याची गरज लागणार आहे.

अलनिनोमुळे यंदाचा पावसाळा लांबणीवर पडला आणि पुरेसा पाऊसही न झाल्याने नाशिक महापालिकेने मे महिन्यापासून शहरात आठवड्यातून एक दिवस पाणी कपातीचा विचार सुरू केला होता. मात्र, पाणी कपातीला विरोध झाल्याने ही वेळ महापालिकेवर आली नाही आणि नाशिककरांना पाण्याची उपलब्धता कमी असूनही पाणी कपातीचा सामना करावा लागला नाही. मात्र, सप्टेंबरमध्ये झालेल्या सर्वाधिक पावसाने जिल्ह्यातील धरणसाठा नवदीपार गेल्याने नाशिककरांवरील पाणी कपातीचे संकट पूर्णपणे टळले. मात्र, जायकवाडीला पाणी द्यावे लागल्याने यंदा मे, जूनमध्ये नाशिककरांना पाण्याच्या संकटाला सामोरे जावे लागू शकते. यामुळे शहराला लागणाऱ्या पिण्याचा पाण्याचा तुटवडा भासणार नाही याचे नियोजन सध्याच्या घडीला महापालिकेला करावे लागणार आहे.

जिल्ह्यात मध्यम आणि मोठ्या आकाराची धरणे : २४

धरणांची पाणी साठवण क्षमता : ६५ हजार ६६४ दशलक्ष घनफूट

धरणांतील उपयुक्त पाणीसाठा : ८२ टक्के

सध्या टँकर सुरू असलेली गावे : ३०० गावे

गावांना पाणीपुरवठा करणार टँकर : ९९

नाशिक शहराला प्रतीदिन गरज : ५५५ दशलक्ष लिटर प्रतीदिन

वार्षिक पाण्याची गरज : ६ हजार १०० दशलक्ष घनफूट

नाशिक महापालिकेने या अगोदरच ६ हजार १०० दशलक्ष घनफूट इतकी पाण्याची प्रशासनाकडे मागणी केली आहे. पाण्याचे नियोजन करण्यासाठी सहा नोव्हेंबरला पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. या बैठकीत जो निर्णय होईल त्यावर पाणीकपातीचा निर्णय होईल. शहराला पाणी कमी मिळाले तर निश्चित पाणी कपात होईल.

– अविनाश धनाईत, अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग

शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना नाही

इगतपुरी तालुक्यातील नांदूरमध्यमेश्वर प्रकल्पांतर्गत असलेल्या दारणा धरण समूहातून जायकवाडी धरणाकडे विसर्ग सुरू करण्यात येणार असला तरी परिसरातील शेतकऱ्यांना याबाबत कोणतीही कल्पना अथवा पूर्वसूचना देण्यात आलेली नाही. दारणा धरणात ९८.३४ टक्के जलसाठा असला तरी समूहातील मुकणे, वाकी धरण यापूर्वी पूर्ण क्षमतेने भरलेले नाही. भविष्यातील इगतपुरी तालुक्यातील शेतीला व पिण्याच्या पाण्यासाठी कोणतेही हक्काचे आरक्षण नसल्याने पाण्याचा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग झाल्यास तालुक्यातील नागरिकांना अनेक संकटांना सामोरे जावे लागेल. सध्या दारणा समूहातून अडीच टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याची माहिती असली तरी जास्तीच्या पाण्याचे विसर्ग करण्यात येते.

दारणा धरण समूहात आजचा जलसाठा

दारणा : ९८ टक्के
भावली : ९९ टक्के
वाकी : ८९ टक्के
मुकणे : ९२ टक्के
भाम :९९ टक्के
कडवा : ९८ टक्के

जिल्ह्यात जमावबंदीचा आदेश

जिल्ह्यातील धरणसमूहांतून जायकवाडीत पाणी सोडण्यास स्थानिकांचा तीव्र विरोध आहे. या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी ग्रामीण भागात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. विरोध लक्षात घेता कादवा, गंगापूर, दारणा, मुकणे, काश्यपी, तसेच नांदूरमध्यमेश्वर धरणाच्या परिसरात लोकांची गर्दी वाढू नये, तसेच धरणांची सुरक्षितता अबाधित राहावी याकरिता धरण परिसरासह आवर्तन मार्गावरील नदीकाठच्या ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्ती, संस्था, सामाजिक व राजकीय संघटना, तसेच समूहांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. सोमवारी (दि. ६ नोव्हेंबर) मध्यरात्री बारापर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत.
जायकवाडीसाठी पाणी सोडण्यास देवयानी फरांदेंचा विरोध,नाशिक जिल्हा प्रशासन सतर्क, कलम १४४ लागू, कारण…

वीजपुरवठा राहणार खंडित

नाशिकमधील धरणांमधून सोडण्यात येणारे पाणी पैठण येथील जायकवाडी जलाशयात निवासायास पोहोचावे याकरिता दि. ३१ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर या कालावधीत पाण्याच्या वहनमार्गावर वीजपुरवठा खंडित ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले आहेत. नदीच्या दोन्ही काठांच्या भागावरून पाणी घेणाऱ्या सर्व उपसा सिंचन योजनांचा वीजपुरवठा ७ नोव्हेंबरपर्यंत दररोज २२ तास खंडित ठेवण्यात येणार आहे.

या वहनमार्गावरील वीजपुरवठा बंद

दारणा धरण ते नांदूरमध्यमेश्वर बंधारा (दारणा नदी)
गंगापूर धरण ते नांदूरमध्यमेश्वर बंधारा (गोदावरी नदी)
मुकणे धरण ते दारणा नदी (औंधा नाला)
कडवा धरण ते दारणा नदी (कडवा नदी)
नांदूरमध्यमेश्वर बंधारा ते खेडलेझुंगे व वडगाव कानळद (गोदावरी नदी)
वर्ल्ड कप सुरु असतानाच BCCI ने घातली भारतीय खेळाडूवर दोन वर्षांची बंदी, पाहा नेमकं काय घडलं…

…या उपाययोजनांचाही अंतर्भाव

-वहनमार्गातील अडथळे दूर करण्याच्या स्थानिक यंत्रणांना सूचना
-कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातील फळ्या काढण्यात येणार
-आवर्तन काळात अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी नदीपात्रालगतच्या मोटारी, इंजिने काढण्याचे निर्देश
बांगलादेशवर विजयानंतर पाकिस्तान सेमी फायनलमध्ये पोहोचणार का, जाणून घ्या समीकरण…
Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed