• Sun. Mar 8th, 2026
    ‘कूल’ काश्मीरचं दर्जेदार केशर आता ‘हॉट’ मुंबईच्या शेतात, मुंबईकर तरुणांचा प्रयोग यशस्वी

    मुंबई : केशर म्हटले की, काश्मीर, हे समीकरण अतूट असे आहे. अन्य भागांत केशरची शेती फुलवण्याचे प्रयोग कमीअधिक प्रमाणात सुरू आहेत. शीतगृहांत काश्मीरसारख्या वातावरणात केशर पिकवण्याचे प्रयोग काही ठिकाणी यशस्वीही ठरले आहेत. मात्र मुंबईसारख्या उष्ण आणि जास्त आर्द्रता असलेल्या शहरात केशर पिकवण्याचा प्रयोग चिराग शिंदे आणि क्रिश आढिया यांनी केला आहे. त्यांच्या दहिसरमधील शीतगृहात नुकतीच फुले आली आहेत. या प्राथमिक अवस्थेतील प्रयोगाला मिळालेल्या यशावर पुढील उत्पादनाचा निर्णय घेतला जाणार आहे.

    ‘मॉडर्न फार्म’ हा चिराग शिंदे आणि क्रिश आढिया या तरुण उद्योजकांनी सुरू केलेला व्यवसाय आहे. चिराग शिंदे यांनी शेती व्यवसाय व्यवस्थापन या विषयात बी. एस्सी. पदवी मिळवली आहे. तर क्रिश शिकाऊ वैमानिक आहेत. नियंत्रित वातावरणात या दोघांनी केशर उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला आहे. ‘काश्मिरी मोगरा’ हा केशराचा प्रकार फक्त काश्मीरमध्ये पिकवणे शक्य होते. हे सगळ्यात उत्तम दर्जाचे आणि महाग केशर असते.

    चिराग आणि क्रिश यांनी काश्मीरमधील वातावरणाप्रमाणे शीतगृहातील तापमान, आर्द्रता नियंत्रित करून काश्मीरमधून आणलेले कांदे रुजवले. एप्रिलच्या मध्यावर त्यांनी या संपूर्ण प्रक्रियेला सुरुवात केली. त्यानंतर २० दिवस त्यासंदर्भात चाचण्या घेण्यात आल्या. यामध्ये उजेडाची गरज असल्याने शेतीसाठी सुयोग्य असे ‘ग्रो लाइट’ बसवण्यात आले. यासंदर्भातही चाचण्या घेण्यात आल्या. वातावरण योग्य असल्याची खात्री पटल्यानंतर या उद्योजकांनी काश्मीरवरून केशराचे कांदे आणले. या कांद्यांवर जून अखेरीस काही फवारणी करण्यात आली. या केशराच्या कांद्यांना बुरशी धरू नये, यासाठी प्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर ऑगस्ट अखेरीस याचे प्लास्टिक ट्रेमध्ये रोपण करण्यात आले. सप्टेंबरमध्ये यातून पहिली कळी बाहेर आली. त्यानंतर हळूहळू या कांद्यांवर कळ्या फुलू लागल्या. १७ ऑक्टोबर रोजी या कळ्यांमधून पहिले फूल उमलले असून त्यानंतर इतरही फुले उमलली.

    रत्नागिरीच्या ‘फणस किंग’चा सातासमुद्रापार डंका, कोकणातील शेतकरी बागायतदारांना करणार मालामाल
    सध्या उमललेल्या फुलांमधून आत्ताच मोठ्या प्रमाणावर केशर मिळणार नाही. पण या सगळ्या कांद्यांमधून मिळणाऱ्या केशराची किंमत काही लाखांत होऊ शकते, असा अंदाज आहे. जागतिक तापमानवाढीच्या काळात शेती उत्पादनावर होणाऱ्या परिणामांची चर्चा होत असताना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड यातून नवी आशा निर्माण करू शकते का, या पर्यायाचाही विचार आवश्यक असल्याचे यामुळे अधोरेखित झाले आहे.

    मराठी सिनेमातून सुरुवात, करोना काळात फटका; पुण्याच्या दाम्पत्याला आता मशरुम शेतीतून सुपर नफा

    … अन्य शहरांतही प्रयोग

    हा प्राथमिक स्तरावरील प्रयोग यशस्वी झाल्याचा आनंद चिराग शिंदे आणि क्रिश आढिया यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’कडे व्यक्त केला. या कांद्यांवर प्रक्रिया करून उत्पादनासाठी वापर करता येऊ शकेल. मुंबईसारख्या अधिक आर्द्रता असलेल्या आणि उष्ण शहरात हा प्रयोग यशस्वी झाल्याने इतर शहरांतही असा प्रयोग करून केशराची शेती करता येऊ शकेल, असा विश्वास या निमित्ताने व्यक्त होत आहे.

    १० वर्षे नोकरीनंतर MBA तरुणाने केली झेंडूच्या फुलांची लागवड; कमी खर्चात जास्त उत्पन्न घेत आर्थिक भरभराट

    Read Latest Maharashtra News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed