• Fri. Mar 20th, 2026
    Mumbai News: पुन्हा दुर्गंधी, कांजुर डम्पिंग ग्राउंडचा नव्याने त्रास; येथे करा तक्रार

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : कांजुरमार्ग डम्पिंग ग्राऊंडमधून गेल्या काही महिन्यांपासून कचऱ्याची असह्य दुर्गंधी सुरू झाली आहे. दिवसा, रात्री-अपरात्री, पहाटे येणाऱ्या या दुर्गंधीमुळे मुलुंड, भांडुप, कांजुरमार्ग, विक्रोळी, घाटकोपर, चेंबूर, कुर्ला या भागातील नागरिक हैराण झाले आहेत.

    कांजुर डम्पिंगवर दररोज सुमारे पाच हजार मेट्रिक टन कचऱ्याची बायोरिॲक्टर पद्धतीने विल्हेवाट लावली जाते. या पद्धतीत किमान दुर्गंधी आणि वेगवान विल्हेवाट लावण्यात येत असल्याचा दावा पालिकेने केला असला तरी प्रत्यक्षात दुर्गंधीची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. डम्पिंग ग्राऊंडच्या नियंत्रण कक्षात दूरध्वनी केल्यानंतर विल्हेवाट प्रक्रिया थोडी कमी करून कचऱ्यावर रासायनिक फवारणी केली जाते. त्यामुळे दुर्गंधी निघून जाते. फवारणीचा प्रभाव कमी झाल्यानंतर काही तासांनी पुन्हा सुरू होते.

    पाकिस्तानचा रडीचा डाव, भारतीयांची तक्रार थेट आयसीसीला करणार, नेमकं घडलं तरी काय पाहा…
    यापूर्वी ही दुर्गंधी मुलुंड, भांडुप, कांजुर, विक्रोळीपर्यंत येत होती. गेल्या काही महिन्यांपासून घाटकोपर, चेंबूर, कुर्ला, शीव या भागापर्यंत त्याचा त्रास होत आहे. तसेच पूर्व द्रुतगती महामार्ग आणि लाल बहादूर शास्त्री मार्गावरून जाणाऱ्या वाहनांतील नागरिकांनाही त्याचा त्रास होतो. गेल्या काही वर्षांपासून या डम्पिंग ग्राऊंडबाबत स्थानिकांनी वारंवार तक्रारी, आंदोलने केली. मात्र पालिका या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत नाही, असे नागरिकांनी सांगितले.

    श्वास घेण्यास त्रास, डोकेदुखी

    दुर्गंधीमुळे चक्कर येणे, श्वास घेण्यासाठी त्रास, डोकेदुखी, डोळे चुरचुरणे, सुका खोकला, घशाला संसर्ग होत असल्याची तक्रार विक्रोळी पश्चिम येथील नागरिक दीपक पवार यांनी केली. विक्रोळी पूर्व कन्नमवार नगर येथील विक्रोळी विकास मंचचे नितीन पाटील यांनी, कचऱ्याच्या दुर्गंधीचे प्रमाण खूप वाढले असून, मध्यरात्री, पहाटे केव्हाही भयंकर दुर्गंधी येत असल्याचे सांगितले. ज्येष्ठ नागरिक सकाळी चालण्यासाठी जात असताना अचानक दुर्गंधी सुरू होते, अशी माहिती दिली.

    ‘पालिकेकडूनच नियम धाब्यावर’

    ‘हे डंपिंग ग्राऊंड पूर्णतः शास्त्रीय पद्धतीने उभारले जाईल. सर्व प्रक्रिया बंद शेडच्या आत केली जाईल, कचऱ्याचा वास येणार नाही, कचऱ्यापासून खतनिर्मिती केली जाईल, असे आश्वासन डम्पिंग ग्राऊंड सुरू करताना पालिकेने दिले होते. प्रत्यक्षात यातील कुठलाच नियम पाळला जात नाही’, असे घाटकोपर येथील राजेंद्र पवार या नागरिकाने सांगितले तर ‘मुंबईत आधीच सातत्याने हवेची ढासळणारी गुणवत्ता, वाहनांचे प्रदूषण, बांधकामांची धूळ यामुळे मुंबईकरांचा जीव गुदमरत असताना त्यात डम्पिंग ग्राऊंडवरील दुर्गंधी असह्य होत आहे. या दुर्गंधीमुळे श्वसनाचा आजार होण्याची भीती आहे’, असे भांडुप येथील संतोष पवार या दुकान व्यावसायिकाने सांगितले.

    येथे करा तक्रार

    मुंबई पालिका हेल्पलाइन : १९१६

    कांजुर डम्पिंग नियंत्रण कक्ष : ८०८००३२२८२

    सलग तीन पराभवानंतर श्रीलंकेचे वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आले का, जाणून घ्या समीकरण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed