• Sat. Sep 21st, 2024

October Heat : पालेभाज्यांचा ‘उन्हाळा’ संपेना, आवक घटल्याने सरसकट २० रुपये जुडी; जुड्यांचा आकार अन् पानेही लहानच

October Heat : पालेभाज्यांचा ‘उन्हाळा’ संपेना, आवक घटल्याने सरसकट २० रुपये जुडी; जुड्यांचा आकार अन् पानेही लहानच

छत्रपती संभाजीनगर : एकीकडे पाऊस अपेक्षेपेक्षा बराच कमी झालेला असताना, दुसरीकडे ‘ऑक्टोबर हिट’चा फटका बसत असल्याने पालेभाज्यांची आवक २० ते २५ टक्क्यांनी घटल्याचे दिसून येत आहे. अर्थातच, पालेभाज्यांचे दर वाढलेले आहेत आणि मागील दोन आठवड्यांपासून हे दर कुठेही कमी होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या स्थितीमुळे बहुतांश पालेभाज्यांची २० रुपये जुडीने किरकोळ विक्री होत आहे. पुन्हा जुड्यांचा आकार आणि पानेही लहान असल्याचे आढळून येत आहे.

यंदा राज्यभरात पाऊस कमी झालेला असताना मराठवाड्यातील निम्म्या जिल्ह्यांमध्ये आणखी कमी पाऊस कमी झाला आहे. त्यातही छत्रपती संभाजीनगर व इतर काही जिल्ह्यांत तर निम्माच पाऊस झाल्याचे दिसून येत आहे. सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी शेतीसाठी आतापासूनच तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे जाणवत आहे. याच स्थितीमध्ये आता ‘ऑक्टोबर हिट’ची भर पडली आहे आणि त्यामुळे सध्या उन्हाळ्यासारखा उकाडा अनुभवास येत आहे. शहरातील चिकलठाणा वेधशाळेत सोमवारी (९ ऑक्टोबर) कमाल ३३.८ अंश सेल्सिअस, तर किमान १९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे आणि या आकड्यांवरून उकाड्याच्या स्थितीचा अंदाज आल्याशिवाय राहात नाही. या सगळ्याचा परिणाम शेतीवर आणि अर्थातच भाज्यांच्या उत्पादनावर झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एक ऑक्टोबर रोजी मेथीच्या ४,८०० जुड्यांची आवक झाली आणि त्यांची १५०० ते २४०० रुपये शेकडा या भावाने ठोक विक्री झाली. तसेच पालकाची ७,७०० जुड्यांची आवक होऊन ३०० ते ७०० रुपये शेकडाप्रमाणे ठोक विक्री झाली. तर, कोथिंबीरीच्या १७,००० जुड्यांची आवक होऊन ४०० ते ६०० रुपये शेकडाप्रमाणे त्यांची ठोक विक्री झाली. त्याचप्रमाणे मंगळवारी (१० ऑक्टोबर) मेथीच्या १८०० जुड्यांची आवक होऊन १९०० ते २००० रुपये शेकड्याने त्यांची ठोक विक्री झाली. तसेच पालकाची ४,७०० जुड्यांची आवक होऊन १००० ते २००० रुपये शेकड्याने, तर कोथिंबीरीची १४,००० जुड्यांची आवक होऊन ८०० ते १५०० रुपये शेकड्याने ठोक विक्री झाली. याचाच अर्थ, मेथीची आवक सुमारे तीन हजार जुड्यांनी घटली आहे आणि किमान भावात शेकड्यामागे ४०० रुपयांनी वाढ झाली आहे. त्याचवेळी सध्या मेथीची जुडी व पानेदेखील अतिशय लहान असल्याचे दिसून येत आहे. पालकाची आवकसुद्धा सुमारे तीन हजार जुड्यांनी घटली आणि भावही शेकड्यामागे ७०० ते १२०० रुपयांनी वाढले आहेत.

कोथिंबीरीची आवकही सुमारे तीन हजार जुड्यांनी घटली आणि भावदेखील चक्क दुपटीने वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्थातच, पालेभाज्यांची आवक एकदम नव्हे तर हळूहळू घटत गेली आहे, हे बाजार समितीच्या इतर दिवसांच्या आकड्यांवरुन दिसून येत आहे. त्याचाच परिणाम म्हणून वरील तिन्ही भाज्यांची किरकोळ विक्री शहर परिसरात २० रुपये जुडीने होत आहे. त्याशिवाय कांद्याची पात, चुका, तांदुळजा आदी पालेभाज्यांचीही विक्री होत असली तरी त्यांची आवक बरीच कमी असल्याचे जाणवत आहे. एकूणच सर्व पालेभाज्यांची जुडीमागे २० ते २५ रुपयांनी विक्री होत आहे.

Mumbai October Heat : मुंबईकरांसाठी ऑक्टोबर हिट तापदायक, सूर्य आग ओकणार; वाचा कसं असेल हवामान

फळभाज्यांचे दर १०० रुपये

पालेभाज्यांचे दर वाढलेले आहेच; शिवाय फळभाज्यांचे दरही वाढलेले आहेत आणि मागच्या दोन आठवड्यांपासून कायम आहेत. सद्यस्थितीत सर्व फळभाज्यांमध्ये पत्ताकोबी, दुधीभोपळा, लाल भोपळ्याचे दर सर्वांत कमी म्हणजेच १५ रुपये पावशेरपर्यंत आहेत. मात्र भेंडी, फुलकोबी, श्रावणघेवडा, छोटे वांगे, गवार, वाल, भरताचे वांगे आदी फळभाज्यांचे दर २० ते २५ रुपये पावशेरपर्यंत पोहोचले आहेत. त्यातही चवळीच्या शेंगांची मंगळवारी २५ ते ३० रुपये पावशेरने विक्री झाल्याचे समोर आले. साहजिकच आता काही फळभाज्या ३० रुपये पावशेरपर्यंत पोहोचल्या आहेत आणि हे दर गेल्या आठवड्यापासून कमी-अधिक प्रमाणात कायम आहेत.

परराज्यातील लसणाचीही विक्री

शहर परिसरात देशी लसणाची ५० ते ७० रुपये पावशेरने विक्री होत आहेच; परंतु अलीकडे परराज्यातील लसणाचीही विक्री लक्षणीय प्रमाणात होत असल्याचे सांगण्यात आले. मात्र संबंधित परराज्यातील लसणाची ९० रुपये पावशेरने विक्री होत आहे. आकाराने मोठा व आकर्षक असल्याने ग्राहक आकृष्ठ होत असल्याचेही विक्रेत्यांनी सांगितले.

भाज्यांची आवक जवळजवळ २० ते २५ टक्क्यांनी घटली आहे आणि त्यामुळेच भाव वाढले आहेत. पुन्हा पालेभाज्यांचा दर्जा अपेक्षेप्रमाणे नाही आणि जुड्या व पानांचा आकारही लहान आहे. भाज्या महाग झाल्याने ग्राहक चार विचार करतोय, असेही जाणवत आहे.

– सोमनाथ शिंदे, विक्रेते

‘१० वेळा भूकंपाचे धक्के, पण मापक यंत्रात दोन वेळाच नोंद; लातूरच्या हासोरी गावातील नागरिक धास्तावले!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed