• Sat. Sep 21st, 2024
कळंबोली धारण तलावासाठी ११६ कोटींची तरतूद, अखेर तलावाचा होणार विकास

कुणाल लोंढे, पनवेल: पनवेल महापालिका क्षेत्रातील सर्वात जुनी वसाहत असलेल्या कळंबोलीतील अत्यंत त्रासदायक प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासक, आयुक्त गणेश देशमुख यांनी कंबर कसली आहे. रस्त्यांच्या पुनर्विकासासाठी १०० कोटींची तरतूद केल्यानंतर त्यांनी धारण तलावाच्या विकासासाठी ११६ कोटी रुपयांची तरतूद करून कळंबोलीकरांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण बैठकीत खारघर, कळंबोली आणि नवीन पनवेलमधील रस्तेविकासासाठी ३०५ कोटींची तरतूद केली. याच बैठकीत कळंबोलीच्या धारण तलावाचा विकास करण्यासाठी महापालिकेने ११६ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे पनवेलच्या आयुक्तांनी एका सर्वसाधारण बैठकीत विकासकामांसाठी २१६ कोटींची तरतूद केली आहे. या धारण तलावाकडे सिडको प्रशासनाने वर्षांनुवर्षे दुर्लक्ष केल्यामुळे येथे कांदळवने निर्माण झाली आहेत.

टँकरमध्ये बसला होता, स्फोट होताच तिसऱ्या मजल्यावर फेकला गेला, सेंच्युरी ब्लास्टमध्ये मृतांचा आकडा चारवर
शहरातून बाहेर पडणाऱ्या पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी आवश्यक असलेल्या धारण तलावामध्ये गाळ साचला आहे. येथे अडथळे निर्माण झाल्यामुळे पावसाळ्यात कळंबोलीतील पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होत नाही. धारण तलाव व ‘स्टॉर्म वॉटर ड्रेन नेटवर्क सिस्टीम’चा अभ्यास करण्यासाठी महापालिकेने सल्लागार कंपनीची नियुक्ती केली होती. यश इंजिनीअरिंग कंपनीने तयार केलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालाची तांत्रिक तपासणी ‘आयआयटी, मुंबई’ यांनी केली. त्यांनी केलेल्या सूचनांप्रमाणे बदल करून कामाचे अंदाजपत्रक केल्यानंतर महापालिका आयुक्तांनी सर्वसाधारण सभेत ११६ कोटी ६० लाख रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली.

असे असतील कामाचे टप्पे

१. धारण तलावामधील गाळ काढणे व इतर कामे – ३३ कोटी २२ लाख

२. पम्पिंग स्टेशन उभारणे – ७१ कोटी ३८ लाख

३. सुशोभीकरण – ११ कोटी ९९ लाख

कांदळवनाचा अडथळा

धारण तलावाचा विकास करताना महापालिकेला सीआरझेडचा अडथळा येणार आहे. तलावात वाढलेल्या कांदळवनाचे नुकसान न करता हे काम करावे लागेल. तसेच, उच्च न्यायालयासह विविध विभागांच्या परवानगी घेणे आवश्यक असल्यामुळे सीआरझेड, उच्च न्यायालयातील प्रक्रिया पूर्ण करण्याकरिता परवानग्या मिळविण्यासाठी कंत्राटदाराला सहा महिन्यांचा अवधी दिला जाणार आहे. याशिवाय, धारण तलावामधील गाळ काढण्यासाठी वेगळ्या सहा महिन्यांची मुदत कंत्राटदाराला दिली जाणार आहे.

नागरिकांना सोयीसुविधा देणे महापालिकेची जबाबदारी आहे, प्रशासक म्हणून आम्ही ती पार पाडत आहोत. कळंबोलीकरांची गरज ओळखून पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी सर्वप्रथम धारण तलावाचा विकास करण्याचा निर्णय घेतला. तळमजल्यावर राहणाऱ्या नागरिकांच्या घरात पाणी साचण्याची समस्या कायमस्वरूपी मिटविण्याचा आमचा प्रयत्न आहे – गणेश देशमुख, आयुक्त, पनवेल महापालिका

काॅन्स्टेबलकडून ३ प्रवासी अन् एका पोलीसावर गोळीबार; जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये थरकाप उडवणारी घटना

कळंबोली वसाहत समुद्रसपाटीपासून खाली असल्यामुळे पावसाळी पाण्याचा निचरा सुरळीतपणे होत नाही. सिडकोकडे अनेक वर्षे पाठपुरावा करूनही न होऊ शकलेली बाब महापालिकेने केली, ही बाब कळंबोलीकर नागरिक म्हणून स्वागतार्ह आहे – रवींद्र भगत, माजी नगरसेवक, शेकाप

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed