आज दुपारी ३ वाजता दरबार हॉलमध्ये श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांच्यासह कुटुंबियांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत आरती झाल्यानंतर बप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला शानदार प्रारंभ झाला. यावेळी उपस्थितांना पान सुपारी देण्यात आली. यानंतर सायंकाळी सरकारी घाटावर हजारो सांगलीकरांच्या उपस्थितीत आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला.
श्री. गणपती पंचायतन संस्थान तर्फे यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. गेल्या दोन वर्षांपासून करोना आणि महापुरामुळे अत्यंत सध्या पद्धतीने साजरा केलेला उत्सव यंदा कोणतेही निर्बंध नसल्याने मोठा उत्साह होता. ऐतिहासिक सांगली संस्थानच्या गणेशाची आज पाचव्या दिवशी मोठ्या थाटामाटात आणि शाही मिरवणूक काढण्यात आली.
अभूतपूर्व अशा पारंपारिक पद्धतीने राजवाडा येथील दरबार हॉल मध्ये श्री गणेशाचे पूजन संस्थानचे राजे विजयसिंह राजे पटवर्धन यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. त्यानंतर दरबार हॉलमध्ये पार पडला. या दरबारमध्ये सांगली शहरातील प्रतिष्ठित व्यक्तींचा सन्मान करण्यात आला आणि त्यानंतर या हॉल मध्ये संगीत सभा पार पडली. यावेळी विजयसिंहराजे पटवर्धन, पौर्णिमाराजे पटवर्धन, आमदार सुधीर गाडगीळ, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, जनसुराज्यचे समित कदम, उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
दरबार हॉल मधील कार्यक्रम आटोपल्यानंतर पालखीतून गणरायाची मूर्ती बाहेर आणण्यात आली. सजविलेल्या रथात विराजमान झालेल्या बप्पांचा रथ राजवाडा चौकामध्ये आल्यानंतर चोहोबाजूने रथावर फुलांचा आणि पेढ्यांचा वर्षाव करण्यात आला. लेझीम आणि झांजपथक मिरवणुकीच्या अग्रस्थानी होते. ढोल-ताशा व ध्वजपथक आणि झांजपथकांनी वातावरणात चांगलाच रंग भरला होता. मिरवणुकांच्या मार्गावर असणाऱ्या विविध मंडळांकडून गणेशाच्या रथाचे स्वागत करण्यात येत होते. गेले पाच दिवस घरात उत्साह आणि चैतन्य निर्माण करणाऱ्या गणरायाला निरोप देताना गणेशभक्त भावूक झाले होते.