‘दिल्लीत माझा पूर्वनियोजित कार्यक्रम होता. अनेकांच्या भेटीगाठी घ्यायच्या होत्या. त्यातील काही भेटी या कायदेतज्ज्ञांशी होत्या. आमदार अपात्रतेसंदर्भात जो कायदा आहे त्याच्यात बदल होत राहतात. परिस्थितीनुसार वेगवेगळे बदल होत असतात. एकूणच सर्वोच्च न्यायालयात जी याचिका दाखल झाली आहे त्यावर जे निर्देश देण्यात आले आहेत किंवा या कायद्यात अजून काही संशोधन करण्याची गरज आहे किंवा त्याची योग्य अंमलबजावणी कशी करता येईल, यासंदर्भातील अनेक तज्ज्ञांशी माझी चर्चा झाली’ असे नार्वेकर म्हणाले.
‘सर्वोच्च न्यायालयाने पुढील आठवड्यात सुनावणी घेण्याचे निर्देश दिले होते. तशीही आमची सुनावणी १४ तारखेला झाली होती आणि ती नियोजित सुनावणी होती. त्यामुळे येत्या आठवड्यात निश्चित सुनावणी घेऊन निर्णय घेऊ आणि त्यासाठी गरज पडल्यास दोन्ही पक्षांच्या प्रमुखांना म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बोलावण्यात येईल,’ असे नार्वेकर म्हणाले.
आमदार अपात्रतेच्या बाबतीत मी सुनावणी घेऊन निर्णय देणार असल्याने अधिक बोलणे उचित ठरणार नाही. ही बाबी न्यायप्रविष्ट आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आमची सदस्यसंख्या २० लाख- परब
नार्वेकर यांच्या विधानावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरे उपस्थित राहतील किंवा त्यांचा अधिकृत प्रतिनिधी या सुनावणीला उपस्थित असेल. आमच्या पक्षाचे २० लाख सदस्य आहेत. तसेच, आम्ही साडेचार लाख प्रतिज्ञापत्र सादर केली आहेत, असे त्यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाकडून यांना दट्ट्या बसल्याशिवाय हे काहीच कारवाई करीत नाही. न्यायालयाने कठोर शब्दांत निरीक्षण नोंदवले आहे; तसेच एका आठवड्यात सुनावणी घ्या आणि पुढील कारवाई कशी असेल त्याची रूपरेषा द्या, असे म्हटले आहे. अपात्र आमदार वाचण्याचा आता कुठलाही मार्ग नाही, ते अपात्र ठरणारच असे अनेक कायदेतंज्ञाचे मत आहे, असा दावाही परब यांनी केला.