जिल्ह्यात सलग तीन दिवसांपासून पावसाच्या हलक्या व मध्यम सरी हजेरी लावत आहेत. सोमवारी सायंकाळनंतर इगतपुरी तालुक्यात पावसाचा जोर वाढला. दारणा धरणातील पाण्याची पातळी वाढू लागल्याने तेथून मोठ्या प्रमाणावर पाणी नदीपात्रात प्रवाहीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. सकाळी सहा वाजता ३ हजार ५०० क्युसेकने पाणी दारणा नदीत सोडण्यात येत होते. सकाळी सात वाजता त्यामध्ये १६०० क्युसेकची वाढ करण्यात आली. त्यामुळे ५ हजार १०० क्युसेकने विसर्ग सुरू होता. मंगळवारी सायंकाळी तो ८०० ने कमी करून ४ हजार ३०० क्युसेक करण्यात आला. नांदुर मध्यमेश्वरमधून सुरू असलेला विसर्ग सकाळी ११ वाजता ३ हजार १५५ क्युसेकने वाढवून ७ हजार ९२४ क्युसेक करण्यात आला.
शहरात १०.२ मिमी पाऊस
शहरात सकाळी साडे आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये १०.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. परंतु, त्यानंतर दिवसभर कधी हलक्या सरी, तर कधी उघडीप असा अनुभव नागरिकांनी घेतला. सायंकाळी साडेपाचपर्यंत केवळ ०.०८ मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात १५ तालुक्यांत सरासरी ६.४ मिमी पाऊस नोंदविला गेला. यामध्ये त्र्यंबकेश्वरला २६.१ मिमी, सुरगाण्यात १०.७ मिमी, पेठ ९.७ मिमी, नाशिक ९.६ मिमी, दिंडोरी ४.६ मिमी, निफाड ३.८ मिमी पावसाची नोंद झाली. याशिवाय अन्य तालुक्यांमध्येही पावसाच्या हलक्या सरींची नोंद झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.